विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

ना. ग. गोरे

 स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत ना ग गोरे 
जन्म. १५ जून १९०७ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हिंदळे येथे.
नारायण गणेश गोरे म्हणजेच ना.ग.गोरे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांचे शिक्षण पुणे येथे बी.ए, एल्‌एल्‌.बी.पर्यंत झाले होते. स्वातंत्र्यसंग्राम आणि समाजवादी चळवळ यातील त्यांचे योगदान मोठे होते. जीवनात आणि साहित्यात विचारांना प्राधान्य देणारा, माणसातल्या विवेकशक्तीवर अढळ श्रद्धा असणारा आणि स्वत:च्या जीवनात बुद्धिप्रामाण्याला सर्वोच्च स्थान देणारा हा समाजवादी विचारवंत होते. पुणे येथील पर्वती मंदिर अस्पृश्यतानिवारण सत्याग्रहापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घ्यावयास सुरुवात केली. १९३० मध्ये महाराष्ट्र यूथ लीगचे ते चिटणीस झाले. १९३६– ३९ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होत. १९४८–५३ मध्ये समाजवादी पक्षाचे ते सहचिटणीस होते. पुढे १९५७–६२ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजासमाजवादी पक्षाचे ते खासदार होते. ह्याच काळात ह्या पक्षाचे ते सरचिटणीसही होते. १९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त करण्यासाठी १९५५ मध्ये झालेल्या गोवा विमोचन सत्याग्रहाचा त्यांनी प्रारंभ केला. त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती; परंतु १९५७ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. नानासाहेबांनी बरेच लेखनही केले आहे. समाजवादाचा ओनामा (१९३५) हे त्यांचे पहिले पुस्तक. जुन्या हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती   ह्या नावाने १९४५ मध्ये प्रसिद्ध झाली. तुरुंगातील भेदक अनुभवांचे प्रत्ययकारी चित्रण तीत आढळते. डाली (१९५६) हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह. शंख आणि शिंपले (१९५७) मध्ये त्यांच्या आठवणी आहेत. सीतेचे पोहे (१९५३) आणि गुलबशी (१९६२) मध्ये त्यांच्या कथा संगृहीत केलेल्या आहेत. आव्हान आणि आवाहन (१९६३), ऐरणीवरील प्रश्न (१९६५) ह्या पुस्तकांत त्यांचे वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी समछंद अनुवाद केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य अनुवादांपैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद विशेष उल्लेखनीय आहे. बेडूकवाडी (१९५७) आणि चिमुताई घर बांधतात (१९७०) ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके. त्यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकांत विश्वकुटुंबवाद (कम्यूनिझम) (१९४१) आणि अमेरिकन संघराज्याचा इतिहास (१९५८) ह्यांचा समावेश होता. मुरारीचे साळगांव (१९५४) हे त्यांनी प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेले पुस्तक. जनवाणी, रचना, जनता  ह्यांसारख्या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. त्यांतून, तसेच अन्य इंग्रजी, मराठी आणि हिंदी नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले आहे. उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची आणि भाषणांची वैशिष्ट्ये. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. ना.ग.गोरे यांचे १ मे १९९३ रोजी निधन झाले.

मधु लिमये

 अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामाजिक व राष्ट्रीय समस्या इ. चा व्यासंग असलेले विचारवंत राजकीय नेते मधु लिमये 
जन्म १ मे १९२२ पुणे येथे. 
मधु लिमये यांच्या वडिलांचा शिक्षकी पेशा होता. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधू लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले. १९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळच्या वातावरणामुळे त्यांना राजकारणात रस वाटू लागला. योगायोगाने त्यांचा परिचय एस. एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, नानासाहेब गोरे व पां. वा. गाडगीळ यांच्याशी झाला. एस. एम. जोशी यांच्या प्रोत्साहनाने वयाच्या १८ व्या वर्षीच ते स्वातंत्र्य चळवळीत शिक्षण सोडून सामील झाले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना चार वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला. १९४८ साली त्यांची काँग्रेस सोशालिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली. १९४९ साली समाजवादी पक्षाचे संयुक्त चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर गोवामुक्ती आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९५८ मध्ये समाजवादीपक्षाचे ते अध्यक्ष झाले. त्यानंतर १९६४ मध्ये मुंगेर (बिहार) येथून ते लोकसभेवर निवडून गेले. १९७३ ते ८० या काळात बांका मतदार संघातून त्यांची निवड झाली. मधू लिमये यांनी विपुल लेखन केलेले आहे. त्रिमंत्री योजना, कम्युनिस्ट जाहीरनाम्याची १०० वर्षे, स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा, पक्षांतर बंदी ? नव्हे, अनियंत्रित नेतेशाहीची नांदी इ. त्यांची मराठी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिदीत व इंग्रजीतही पुष्कळ लेखन केलेले आहे. राजनिती का नया मोड, मार्क्सवाद और गांधीवाद, संक्रमणकालीन राजनिती इ. तर प्राईम मुव्हर्स : रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल इन हिस्टरी हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या या विविधांगी लेखनावरून त्यांच्या चौफेर व्यासंगाची कल्पना करता येते. आपल्या विविध आठवणींचे संकलन करून आत्मचरित्र लिहिण्याचा त्यांनी संकल्प केला होता. आत्मकथा या नावाने त्यातील एक खंड प्रसिद्ध झलेला आहे. अनेक व्यक्ति, अनेक घटना या खेरीज मधू लिमये यांच्या जीवनाची समृद्धता व त्यांच्यावरील संस्कार याचेही आपल्याला त्यात दर्शन घडते. मधू लिमये यांचे ८ जानेवारी १९९५ रोजी निधन झाले. 

🙏🙏🙏

लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी


लेखक, कवी, नाटककार  राम गणेश गडकरी 
जन्म. २६ मे १८८५
गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी  'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी  'मासिक मनोरंजन' मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. मा.राम गणेश गडकरी यांचे २३ जानेवारी १९१९ रोजी निधन झाले.

बाळशास्त्री जांभेकर

 मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर 
जन्म. ६ जानेवारी १८१२
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतल्या आद्य पत्रकारांपैकी एक पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.
प्राचीन वाङ्मयाचे बाळकडू व संस्कार घरातून मिळाल्यामुळे त्यांचे संस्कृत व मराठी विषयांचे अध्ययन वयाच्या तेराव्या वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे ते मराठी लेखन, वाचन, व्यावहारिक गणित, तोंडी हिशोब, रामदास-तुकाराम इत्यादी चरित्र, वामन, मोरोपंत आदी प्रसिद्ध कवींच्या कविता व अमरकोश-पंचकाव्यामध्ये आठव्या वर्षी पारंगत झाले. त्यानंतर ते आंग्ल भाषेच्या अभ्यासासाठी मुंबईला आले. एल्फिन्स्टन यांनी २१ ऑगस्ट १८२२  रोजी मुंबई येथे दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, बुक अँड स्कूल सोसायटी नावाची शिक्षण संस्था काढली. त्या संस्थेच्या शाळेत बाळशास्त्रींनी प्रवेश घेतला. इंग्रज प्राध्यापकाने हात टेकावे असे नैपुण्य त्यांनी त्या परकीय भाषेत मिळवले. ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये अग्रगण्य होते व शिक्षकांचे आवडतेही झाले. शिक्षणाशिवाय, विशेषत: पाश्चात्य देशांतील आधुनिक ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही ही बाळशास्त्रींची भूमिका होती. गव्हर्नर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन १८२७ मध्ये सेवानिवृत्त होऊन विलायतेला परत गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ मुंबई शिक्षण मंडळी यांनी त्यांच्या नावाने एल्फिन्स्टन स्कूल सुरू केले. जांभकर यांची प्रखर विद्वत्ता पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. सतरा इंग्रज प्राध्यापकांच्या ताफ्यात ते एकमेव भारतीय प्राध्यापक होते. राष्ट्रीय नेते दादाभाई नौरोजी व गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे त्यांचे विद्यार्थी होते. त्या काळात मुंबईबाहेर सरकारी इंग्रजी व मराठी शाळा फार थोड्या होत्या. सन १८४४ पर्यंत पुणे, ठाणे, सुरत या तीन ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू झाल्या होत्या. उपरोक्त प्रत्येक विभागासाठी मुख्य शाळा तपासनीस (ज्यांना सुपरिंडेंटेंट संबोधित असत) असे नेमण्यात आले. त्या पदावर बाळशास्त्री जांभेकर यांनीही दक्षिण विभागातील मराठी व कानडी शाळा तपासणीचे काम, वाहतुकीची साधने उपलब्ध नसतानादेखील चार वर्षे केले म्हणून ते पहिले मराठी शिक्षण अधिकारी होते. ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ने चांगले प्रशिक्षित अध्यापक तयार करावेत अशी बाळशास्त्रींची कल्पना होती. युरोपीयन अधिकाऱ्यांनी ती कल्पना स्वीकारली आणि आचार्य बाळशास्त्रींच्या शिफारसीने १८४५ मध्ये ‘अध्यापक वर्ग’ (डी.एड., बी.एड. कॉलेज) सुरू केले गेले. त्यांचे पहिले संचालक म्हणून आचार्यांनीच काम पाहिले. मुंबईसारख्या दाट वस्तीत मोहनगरीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, त्यांचे शीलसंवर्धन व्हावे या उद्देशाने आचार्यांनी मुंबईत त्यांच्या घराशेजारी वाडा भाड्याने घेऊन पहिले विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. तेथे ते विद्यार्थ्यांच्या शिस्त, आरोग्य, संस्कार व शिक्षण यांकडे जातीने लक्ष देत. केवळ शिक्षणाचा प्रसार करून चालणार नाही, तर सनातनी आणि प्रतिगामी लोकांच्या मनावर बेगडी श्रद्धांचा जो कालबाह्य पगडा आहे तो हटवला पाहिजे. लोकांच्या भावना संवेदना विशाल-उदार झाल्या पाहिजेत यासाठी जांभेकर हिरीरीने काम करत. त्या विषयावर त्यांचा ‘Liberty of Sentiments’ हा लेख प्रसिद्ध आहे. त्यासाठी देशी भाषेत वृत्तपत्र असणे अत्यावश्यक आहे हे जाणून त्यांनी मराठीत पहिले वृत्तपत्र – दर्पण - सुरू केले. बाळशास्त्री यांनी ‘दर्पण’ प्रकाशित करण्यामागील आपली भूमिका १२ नोव्हेंबर १८३१ रोजी प्रॉस्पेक्ट (प्रस्ताव) या नावाने प्रकाशित केली. ‘दर्पण’चा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रसिद्ध झाला. ते द्विभा‍षिक वर्तमानपत्र होते. एकच वेळी इंग्रजी व मराठीत निघणा-या त्या पत्राच्या  पानातील दोन स्तंभात डावीकडचा स्तंभ इंग्रजी व उजवीकडच्या स्तंभात भाषांतर असे. त्या्स एकूण आठ पाने असत. जांभेकर यांनी वाचकांची मागणी वाढू लागल्यानी 'दर्पण साप्ताहिक' ४ मे १८३२ पासून सुरू केले. जांभेकर यांची संपादकीये विचारप्रवर्तक असत. ते सभ्य प्रतिष्ठित भाषेत सरकारवर सडेतोड टीका करत. ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा ब्रिटिशांचे शासन होते आणि वृत्तपत्र नियंत्रण कडक होते ते  १८३५ नंतर थोडे शिथील झाले. त्यावेळी साक्षर वर्ग कमी होता. त्यामुळे वाचकांची संख्याही कमी होती. तरीही ‘दर्पण’चे त्या काळात तीनशे वर्गणीदार होते. त्या काळात ब्रिटिशांच्या नोकरीत असूनसुद्धा बाळशास्त्री यांनी सरकारला रूचो वा न रूचो, नि:स्पृहपणे विविध सामाजिक विषयांवर ‘दर्पण’मधून लेख, अग्रलेख लिहिले ते दूरदृष्टीचे आहेत. सनातन धर्मातील एकांतिक संन्यास प्रवृत्ती, अंधगुरूभक्ती, कर्मठ कर्मकांडे. चातुर्वर्ण्य, जन्मनिष्ठ उच्चनीचता, जातिभेद, धर्माचा अतिरेक इत्यादींबाबत विचारमंथन ‘दर्पण’मधून झाले. स्त्रियांवर लादलेली बंधने, बालविवाह, विधवाविवाह, पारतंत्र्य, केशवपन यांसारख्या गोष्टींमुळे समाजरचना चुकीच्या पायावर उभी आहे . त्यातील दोष काढले नाहीत तर पिढ्यान् पिढ्या ते सर्वांना भोगावे लागेल. त्यातून समाजाचा, धर्माचा, राष्ट्राचा विकास तर होणार नाही, पण शृंखलेमुळे अवनती होईल आणि त्याला पारतंत्र्याचे, गुलामीचे कायम स्वरूप येईल हे जांभेकरांनी ‘दर्पण’मधून सांगितले. ‘दर्पण’चा शेवटचा अंक २६ जून १८४० रोजी प्रसिद्ध झाला व ते बंद करण्यात आले. त्या अंकात 'लास्ट फेअरवेल' हे संपादकीय लिहून त्यांनी वाचकाचा निरोप घेतला. इंग्रजी राज्याबरोबर विद्या आली आणि धर्म व संस्कृतीसुद्धा आली. या बदलावर बाळशास्त्री व नाना शंकरशेठ यांनी जहरी टीका केली. पाश्चात्य विद्वत्ता व विज्ञान यांबद्दल त्यांना रास्त आदर होता पण मिशनरींच्या धर्मांतर धोरणावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. तत्कालीन असा एकही विषय नाही की ज्यास बाळशास्त्री जांभेकर यांनी स्पर्श केला नाही! बाळशास्त्री जांभेकर यांचा ज्योतिष व गणित या विषयांतील अधिकार फार मोठा होता. त्यांनी ‘शून्यलब्धि’ म्हणजेच Differential calculus या विषयावर मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिले. बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिल्याt वृत्तपत्राचे संस्थापक तर होतेच, सोबत ते मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’चे संस्थापक संपादक देखील होते. त्याचबरोबर पहिले मराठी असिस्टंट प्रोफेसर, ‘बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी’ या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक, नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी या ‘लोकसुधारणा’ व्यासपिठाचे संथापक, पहिले मराठी शाळा तपासनीस, पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक, ज्ञानेश्वरीची पहिली शिळाप्रतही (छापील प्रत) त्यांनीच १८४६ मध्येह प्रसिद्ध केली. याशिवाय पहिले दूरदृष्टीचे समाजसुधारक, महाराष्ट्राचे आद्यशिक्षण तज्ज्ञ, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांचा उल्लेख अभिमानाने केला जातो. त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्राविण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता. 
 बाळशास्त्री जांभेकर* यांचे १७ मे १८४६ रोजी निधन झाले.

बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे


बाळाजी बाजीराव ऊर्फ  नानासाहेब पेशवे 
जन्म.१९ मे १८२४
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. थोरले बाजीराव यांच्या नंतर शाहू महाराजांनी त्यांना मराठा साम्राज्याचे पेशवे बनवले. त्यांच्याच काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले. मराठ्यांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पेशवेपदावर राहण्याची कामगिरी नानासाहेब पेशव्यांच्या नावावर आहे. 
२५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी सातारा दरबारी नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने उत्तर भारतात जरब बसवली. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य ताकत बनली. परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा नानासाहेब पेशवे यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्याच्या धक्काने त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला १६३६ ते १७५७ दरम्यान स्वराज्यात नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कोणत्याही लढाई शिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला. तसेच, लष्करी कारवाई करून निजामाच्या ताब्यातील खानदेश, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हे देखील स्वराज्यात आणले. नानासाहेबांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. १७४९ साली छत्रपतींचा शाहू महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर नानासाहेबच मराठा राज्याचे सर्वसत्ताधीश झाले. शाहू महाराजांचे वारस रामराजे हे सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होते. तरीही नानासाहेबांनी छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला. त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. नानासाहेबांनी छत्रपतींना दरवर्षी पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारात ठरवण्यात आले.
नानासाहेबांचा शत्रूला किती वचक, धाक व विश्वास होता हे पोर्तुगीज, इंग्रज, निजाम, अहमदशहा अब्दाली व मोगल दरबार यांच्या पत्रांवरून स्पष्ट दिसून येतो. राज्यकर्ता हा केवळ आक्रमक दिसून चालत नाही तर तो विश्वासूही दिसावा आणि असावा लागतो. नानासाहेबांच्या विश्वासनियतेची दोन जबरदस्त उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेबांस पेशवाईची वंशपरंपरागत दिलेली सनद व दिल्लीच्या बादशहाने स्वसंरक्षणार्थ केलाला अहमदीया करार. 
पेशवा या पदावरील व्यक्तिच्या जबाबदार्याी शिवछत्रपतींच्या 'कानुन जाबता' मध्ये स्पष्ट केल्या आहेत. नानासाहेबांनी त्याचे तंतोतंत पालन करून नियोजनबद्ध पध्दतीने स्वराज्याचा केवळ विस्तारच केला नाही, तर स्वराज्य आर्थिक दृष्या मजबूत केले. अंतर्गत प्रशासकीय, व्यवस्थापन, कायदेव्यवस्था, शिस्तबध्द आर्थिकव्यवस्था, नवनवीन आर्थिक स्त्रोतांना उत्तेजन, स्वराज्याच्या उन्नत्तीला अनुसरून ठरविलेले परराष्ट्रीय धोरण, कला व्यापाराला चालना, शेतीला प्राधान्य, सेना उभारणी, सैनिकांच्या कुटुंबाची व्यवस्था, नगरविकास, धार्मिक स्थळांना संरक्षण, नदीवरील घाट, पाणीपुरवठा यावर जातीने लक्ष ठेवून उल्लेखनीय कामगीरी बजावली. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील सर्व समाज समावेशक धोरण अनुसरून स्वराज्य सार्वभौम केले. नानासाहेब पेशवे यांचे २३ जून १७६१ रोजी निधन झाले.

छत्रपती संभाजी महाराज

 छत्रपती  संभाजी महाराज 
जन्म.१४ मे १६५७ किल्ले पुरंदर येथे.
 शेर शिवा का छावा, धर्मवीर, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित ., धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतील, असे छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजे अगदी लहान असतानाच आई सईबाईंचे निधन झाले. पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची महिला त्यांची दूध आई बनली. जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीवेळी सोबत नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षांचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याने शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैन्याचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले. जिजाबाईंचे निधन झाल्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्यांनशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागल्यामुळे शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर त्यांना जाता आले नाही. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. सोयराबाई आणि दरबारातील मानकर्यां नी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत, असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की, शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.
१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र, काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यां ना हत्तीच्या पायी दिले. औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्यााचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की, त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||, अशी स्वतःची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती.
छत्रपती संभाजी महाराज दिसायला राजबिंडे होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यातही बरेच शत्रू निर्माण झाले होते. राजकारणात मुरब्बी असलेल्या संभाजी महाराजांची कीर्ती केवळ छत्रपती म्हणून नव्हती. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. छत्रपती संभाजी महाराज हळवे होते. मृदू मनाचे कवीही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. तसेच गागाभट्टांनी समनयन हा ग्रंथ लिहून संभाजीराजांना अर्पण केला. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो. समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नां्ची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले. संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली. क्रूर अत्याचाराने परिसीमा गाठली, तरी संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. धर्माभिमानी, लढवय्या, शेर का छावा, असामान्य शौर्य गाजवणाऱ्या संभाजी महाराजांची फाल्गुन अमावास्या म्हणजेच, ११ मार्च १६८९ रोजी प्राणज्योत मालवली. 🙏

दुर्गा भागवत

नावातच दुर्गा आणि प्रत्यक्षातही दुर्गा 
श्रेष्ठ मराठी लेखिका; लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक; समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्धधर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या दुर्गा भागवत,आज जयंती (१० फेब्रुवारी १९१०-मृत्यू: ७ मे २००२ ).. जन्म इंदूर येथे. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नासिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करुन म.गांधीच्या राष्ट्रीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रुडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी. च्या प्रबंधासाठी 'सिंथिसीस ऑफ प्रूबंधासाठी सिंथिसीस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिंन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. म. गांधी, टॉलस्टॉय, हेन्री डेव्हीड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रमुख प्रेरणास्थाने होत.
गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे दोन वर्षे (१९५८-६०) समाजशास्त्रविभागाच्या प्रमुखपदी त्या होत्या. तसेच साहित्य-सहकार ह्या मासिकाचे वर्षभर (१९५७) संपादनही त्यांनी केले. हे अपवाद वगळल्यास त्यांनी संशोधन-लेखन यांसाठी नोकरी व्यवसायापासून मुक्तता घेतली. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ अर्ली बुद्धीस्ट ज्युरिस्पूडन्स (१९३८) हा होय. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ राजारामशास्त्री भागवत. व्यक्तिचित्र व वाङमयविवेचन (१९४७) आणि पहिला मराठी ललितग्रंथ महानदीच्या तीरावर-गोंडजीवनावरील नवलिका-(१९५६) हा होय.
संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. भाषाशास्त्रावरील ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी (१९४०); बौद्ध व जैन धर्माच्या अभ्यासात हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित रोमान्स इन सॅक्रिड लोअर (१९४६); मानववंशशास्त्राचे परिचायक ए प्राइमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी (१९५०); भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर (१९५६) व रिडल इन इंडियन लाइफ, लोअर अँड लिटरेचर (१९६६) हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ. त्यांचे बरेचसे महत्त्वाचे लेखन लेखरूपांतही आहे. हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी (१९४७) हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होय.(अधिक माहिती मराठी विश्वकोष )
आणिबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पतकरला. कराड येथे भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले (१९७५) व तेथेच त्यांनी आणिबाणीवर तोफ डागली .   नारायण यांची तब्येत चागली राहावी म्हणून त्यांनी संमेलनातच प्रार्थना केली . त्यावेळी यशवंतराव चव्हाण उपस्थित होते त्यांचेकडे बघून त्या म्हणाल्या यशवंतराव उठा जयप्रकाशजिंसाठी प्रार्थना करूया . त्यानंतर लगेचच त्यांना कारावासात जावे लागले ..

रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर (७ मे १८६१ – ७ ऑगस्ट १९४१). जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटूंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ (१८१७–१९०५) आणि आई शारदादेवी (१८२६/२७–१८७५). त्यांच्या एकूण पंधरा अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे. ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. तेथून यशोहर गावी स्थलांतर. जातिबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्‍या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय (१७७२–१८३३) यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे तीर्थरूप. बंगाली ब्राह्मसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे. ब्राह्मसमाजाचे अनुयायी त्यांचा महर्षी देवेंद्रनाथ असा उल्लेख करीत. सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती.


रवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ (१८४०–१९२६) हे कवी आणि तत्त्वचिंतक; सत्येंद्रनाथ (१८४२–१९२३) हे पहिले भारतीय आय्. सी. एस्. अधिकारी व व्यासंगी लेखक; ज्योतिरिंद्रनाथ (१८४९–१९२५) हे नाटककार, संगीतरचनाकार व भाषांतरकार; भगिनी स्वर्णकुमारी (१८५५–१९३२) ह्या कादंबरीकर्त्या. जोडासाँको भागातील वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्गशोभा पाहत बसणे, हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा होता. ‘जॉल पॉडे पाता नॉडे’ (पाणी पडे-पान झुले) ह्या लहानशा ओळीतल्या छंदाने व यमकाने त्यांच्या बालमनात शब्दांचे नृत्य सुरू झाले. घरात काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य, संगीत यांचे अप्रत्यक्ष संस्कार घडत होते. त्यामुळे पाठशाळेतील आनंदशून्य शिक्षण त्यांना रुचेना. १८७४ साली कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स स्कूलमधील परीक्षा ते उत्तीर्ण झाले नाहीत. त्यानंतर त्यांचे शिक्षण त्यांचे बंधू हेमेंद्रनाथ (१८४४–८४), द्विजेंद्रनाथ आणि ज्योतिरिंद्रनाथ यांच्या देखरेखीखाली मातृभाषेतून सुरू झाले. रवींद्रनाथांना निसर्गतः लाभलेल्या रूपसौंदर्याइतकीच मधुर आवाजाचीही उपजत देणगी होती. ‘मला कधी गाता येत नव्हते असे आठवत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. आदी ब्राह्म समाजाचे गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती (१८०४–१९००) हे त्यांचे पहिले गायनगुरू. यदुभट्ट यांच्याहीपाशी त्यांचे संगीतशिक्षण झाले. मात्र संगीताच्या कुठल्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांत चालींची विविधता आढळून येते. तिचे मूळ ह्या चोहोकडून मिळवलेल्या गाण्यांत आहे. जे संगीतात तेच साहित्यात. ज्येष्ठ बंधूंच्या ग्रंथसंग्रहातील थोर लेखकांचे ग्रंथ, अबोधबंधु, वंगदर्शन यांसारखी नियतकालिके, बालवयात वाचीत असताना नोकरचाकरांच्या सहवासात चाणक्य श्लोक, कृत्तिवासाचे रामायण, महाभारातांतील कथा, विद्यापती, चंडिदास यांची काव्ये यांचेही श्रवण चालत असे. लहानपणी त्यांना इंग्रजी शिकवायला येणाऱ्‍या अघोरबाबू नावाच्या शिक्षकामुळे साहित्याइतकीच रवींद्रनाथांना विज्ञानाचीही गोडी उत्पन्न झाली आणि ती आयुष्याच्या अखेरीपर्यत टिकली.
बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरजवळ एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून देवेंद्रनाथांनी विकत घेऊन तेथे एक कुटिर बांधले. पुढे त्याचीच दुमजली इमारत केली. तिचे नाव ‘शांतिनिकेतन’. जवळच असलेल्या सप्तपर्णीच्या विशाल वृक्षाखाली महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसत. रवींद्रनाथांचा संस्कृत, इंग्रजी भाषांचा अभ्यास स्वतः देवेंद्रनाथांनी इथल्या वास्तव्यात करून घेतला. ज्योतिर्विद्येची त्यांना गोडी लावली. रवींद्रनाथांचे काव्यलेखन बालवयातच सुरू झाले होते.तत्त्वबोधिनी पत्रिका नावाच्या नियतकालिकात त्यांची ‘अभिलाष’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्या वेळी ते बारा वर्षाचे होते. देशप्रेम, सामाजिक सुधारणांचा प्रचार यासाठी टागोर कुटुंबियांच्या साहाय्याने नवगोपाळ मित्र, राजनारायण बसू वगैरे समाजसुधारक कलकत्त्यात ‘हिंदु मॅला’ नावाने एक उत्सव साजरा करीत. त्याच्या नवव्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी वयाच्या चौदाव्य वर्षी (१८७४) देशप्रेमाने प्रेरित होऊन लिहिलेली ‘हिंदु मॅलाय उपहार’ ही कविता वाचली. ह्याच सुमाराला त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. नंतर बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांचे छत्र त्यांना लाभले.
बंगालमध्ये ब्रिटिश विरोधी चळवळींनी जोर धरला होता. अशा वेळी इटालियन देशभक्त मॅझिनी याच्या ‘कार्बोनारी’ सारख्या क्रांतिकारकांच्या ‘संजीवनी सभा’ नावाच्या गुप्त मंडळात ते दाखल झाले. राजनारायण बसू ह्या मंडलाचे सूत्रचालक होते. हे मंडळ फार काळ टिकले नाही. इथून पुढे रवींद्रनाथांच्या लेखनाने खूप वेग घेतला. १८७६ सालापासून ज्ञानांकुर ओ प्रतिबिंबह्या नियतकालिकातून त्यांच्या कथा, कविता, निबंध तसेच भाषांतरित लेख प्रसिद्ध होऊ लागले. आठ सर्गांचे बनफूल(१८८०) हे खंडकाव्यही याच काळातले. वैष्णव संत कवींच्या धर्तीवर ‘भानुसिंह’ ह्या टोपणनावाने ब्रजबुलीत त्यांनी गीत लिहिली. मात्र कुमारवयातील आपल्या या साहित्यरचनेतील अपरिपक्वतेची रवींद्रनाथांना जाणीव होती. भारती ह्या टागोर कुटुंबातर्फे प्रसिद्ध होणाऱ्‍या मासिकातून १८७३ नंतर त्यांनी पुष्कळ लेखन केले. १४ ते १६ वर्षे वयातील त्यांच्या कविता त्यानंतर बऱ्‍याच वर्षांनी शैशव-संगीत (१८८४) ह्या नावाच्या संग्रहात प्रसिद्ध झाल्या. 



भारतीतून प्रसिद्ध झालेल्या साहित्यातकविकाहिनी नावाचे काव्य-नाट्य होते. १८७८ साली ते ग्रंथरूपाने छापून प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथांचा हा पहिला मुद्रित ग्रंथ. याच सुमाराला त्यांचे बंधू सत्येंद्रनाथ यांनी रवींद्रनाथांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरविले. विलायती रीतिरिवाज आणि इंग्रजी भाषेतील संभाषणात अधिक सफाई येण्यासाठी त्यांनी रवींद्रनाथांना अहमदाबादेतील आपल्या प्रासादतुल्य सरकारी बंगल्यात मुक्कामासाठी आणले. वाचन, लेखन, गीतरचना, त्या गीतांना चाली देणे ह्या कार्यासाठी रवींद्रनाथांनी येथील निवांततेचा उपयोग करून घेतला. ‘क्षुधित पाषाण’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कथेचे बीज ह्या ऐतिहासिक वास्तूवरून त्यांच्या मनात रुजले. उत्तम इंग्रजी ग्रंथांचे अध्ययन आणि कालिदासाच्या काव्याचा त्यांचा अभ्यास येथेच झाला.
सत्येंद्रनाथांनी त्यानंतर इंग्रजी रीतिरिवाजाच्या अभ्यासासाठी त्यांची सोय मुंबईला डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांच्या बंगल्यात सधन, सुशिक्षित आणि पाश्चात्त्य धाटणीची रहाणी असलेल्या कुटुंबात केली. तत्कालीन बंगालमधील श्रीमंत घराण्यातील स्त्रिया अंतःपुरातच असत. स्त्रियांच्या बाबतीत पुरुषातही एक प्रकारचा संकोच असे. तर्खडांच्या घरातील मोकळ्या वातावरणाने आणि विशेषतः डॉ. तर्खड यांची कन्या अन्नपूर्णा (आन्ना) हिच्या सहवासाने रवींद्रनाथांचा हा बुजरेपणा गेला. ह्या स्नेहबंधनातून निर्माण झालेली अनेक गीते शैशष–संगीत ह्या संग्रहात आहेत. १८७८ साली ⇨ सत्येंद्रनाथ टागोरांच्या बरोबर रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. तेथे लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हेन्री मॉर्ली यांच्यापाशी त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. तेथून भारतीमध्ये त्यांची ‘यूरोपयात्री कोनो वंगीय तरुणेर पत्र’ ह्या शीर्षकाखाली यूरोपीय जीवन आणि संस्कृतीसंबंधीची पत्रे प्रसिद्ध होऊ लागली. इंग्लंडमधील समाजजीवनासंबंधी त्यांत प्रतिकूल टीका असल्यामुळे इंग्रज धार्जिण्या उच्चभ्रू बंगाली समाजाचा त्यांच्यावर रोष झाला. १८८० साली त्यांना परत बोलावून घेण्याचे हेही एक कारण असावे असे म्हणतात. मात्र इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील स्त्रीवर्गाला मिळणाऱ्‍या सामाजिक व्यवहारातील स्वातंत्र्याचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला. यूरोप प्रवासातील पत्रे १८८१ साली युरोप प्रवासीर पत्र नावाने प्रसिद्ध झाली. बंगालीच्या लोकव्यवहारातील (चलित) भाषेतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतरच्या काळात रवींद्रनाथांनी बंगाली ग्रांथिक (साधू) भाषेला सहज भाषेचे वळण देण्यात फार मोठे यश मिळविले. इंग्लंडमधून रवींद्रनाथ कोणतीही शैक्षणिक पदवी न मिळवता परतले. मात्र तिथल्या वास्तव्यात चौतीस प्रवेशांचे व चार हजार ओळींचे भग्नहृदय (१८८१) हे अपुरे नाट्य-काव्य त्यांनी लिहिले. भारतात आल्यावर ते पुरे केले. पौगंडावस्थेतील बुजऱ्‍या रवींद्रनाथांचे, पाश्चात्त्य जगातील गतिशीलता, स्वतंत्रता यांसारख्या सद्‌गुणांच्या प्रभावामुळे एका धीट, स्पष्टवक्त्या तरुणात रूपांतर झाले होते. १८८१ साली त्यांनी वाल्मिकी प्रतिभा ही पहिली संगीतिका लिहून तिचा जोडासाँको येथील टागोर वाड्यात पहिला प्रयोग केला. त्या संगीतिकेतील गीतांत भारतीय मार्गी व देशी संगीताप्रमाणे यूरोपीय ललित संगीताचाही वापर केला होता. जे सूर भावनेच्या अभिव्यक्तीला अधिक परिणामकारक वाटतील, त्यांचा गीतगायनात मुक्तपणाने उपयोग करण्याच्या ह्या प्रवृत्तीतूनच ⇨ रवींद्रसंगीत निर्माण झाले.
रवींद्रनाथांची साहित्य, संगीत, कलासाधना उत्साहाने चालू असताना त्यांना पुन्हा एकदा इंग्लंडला पाठवून बॅरिस्टर करण्याचा कुटुंबातील वडील मंडळींनी प्रयत्न केला; परंतु विलायतेच्या बोटीत चढण्यापूर्वी मद्रास बंदरातूनच ते परतले आणि कलकत्त्याला आपले बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांच्या बिऱ्‍हाडी राहू लागले. येथे त्यांच्या कलासाधनेला अधिक पोषक वातावरण लाभून त्यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेचे उन्मेश जोमाने प्रकट होऊ लागले. स्पेन्सरच्या ‘द ऑरिजिन अँड फंक्शन ऑफ म्यूझिक’ ह्या निबंधाने प्रभावित होऊन त्यांनी ‘संगीताची उत्पत्ती आणि उपयोगिता’ ह्या विषयावरचा निबंध लिहिला. भारतीय संगीतातील रागप्रधान संगीत भावनाशून्य झाल्याची चिंता त्यात व्यक्त झाली आहे. त्या विवेचनात त्यांचा ओढा गीतगायनाकडे अधिक असला, तरी त्यानंतर तीस वर्षांनी त्यांनी स्वरप्रधान संगीताचे ऐश्वर्य व स्वयंसिद्ध स्थान मान्य केले. त्या काळी त्यांच्या काव्यरचनेचा मूलस्त्रोत संगीत हाच होता. त्यांच्या तत्कालीन काव्यसंग्रहांची नावेदेखील संध्या संगीत(१८८२), प्रभात संगीत (१८८२), शैशवसंगीत, छबि ओ गान (१८८४), कडि ओ कोमल (१८८६, म. शी. तीव्र आणि कोमल) अशी संगीताशी नाती सांगणारी आहेत. बंधू ज्योतिरिंद्रनाथांच्या बंगल्यात रहात असताना आलेल्या साक्षात्कारासारख्या एका विलक्षण अनुभवातून त्यांची ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही अप्रतिम कविता निर्माण झाली. जीवनस्मृति(१९१२) ह्या ग्रंथात त्या अनुभूतीचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. इथून पुढे त्यांच्या काव्यजीवनातील विषादपर्व संपून आनंदपर्व सुरू झाले.
सत्येंद्रनाथांबरोबर काही काळ कारवारलाही ते राहिले. तिथल्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात त्यांच्या प्रतिमेला खूप बहर आला. प्रकृतीर प्रतिशोध (१८८४) ही नाटिका त्यांनी येथील मुक्कामात लिहिली. १८८३ साली कारवारहून कलकत्त्याला परतल्यानंतर, महर्षी देवेंद्रनाथांच्या जमीनदारीची व्यवस्था पाहणाऱ्‍या कारकुनांपैकी वेणीमाधव रायचौधुरी ह्या सामान्य परिस्थितीतील पिराली ब्राह्मण गृहस्थाची मुलगी भवतारिणी (जन्म १८७३) हिच्याशी त्यांचा विवाह झाला. नूतन वधूचे नाव ‘मृणालिनी’ असे ठेवण्यात आले. देवेंद्रनाथांनी तिच्या शिक्षणाची व्यवस्था लॉरेटा हाऊस ह्या विद्यालयात केली. मृणालिनी देवींनी रवींद्रनाथांच्या जीवनात एक अत्यंत कर्तव्यपरायण गृहिणी होऊन त्यांच्या संसाराचा भार वाहिला. १८८४ साली ज्योतिरिंद्रनाथांच्या पत्‍नी कादंबरी देवी यांनी आत्महत्या केली. रवींद्रनाथांच्या मनावर ह्या घटनेचा फार मोठा आघात झाला. रवींद्रांच्या तरुण काळात झालेले हे दुःख त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना जाणवत राहिले होते; पण त्यांनी आपल्या जीवनात कुठलीही अवस्था अखेरची मानली नाही. म्हणून ह्या मृत्युशोकानेही त्यांना आपल्या कर्तव्यापासून परावृत्त केले नाही. त्याच वर्षी ते आदी ब्राह्म समाजाचे कार्यवाह झाले आणि ज्येष्ठ बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चतर्जी यांच्याशी हिंदू धर्मातील आदर्शांबद्दल त्यांचा जाहीर वादविवाद झाला.
१८८५ साली ठाकूर परिवारातर्फे निघणाऱ्‍या बालक ह्या मासिकाच्या संपादिका ज्ञानदानंदिनी देवी (सत्येंद्रनाथांच्या पत्नी) यांना त्यांनी संपादनात साहाय्य करायला सुरुवात केली. त्याच वर्षी रविच्छाया हा त्यांचा गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. १८८६ साली त्यांची ज्येष्ठकन्या माधुरीलता (बेला) हिचा जन्म झाला. डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले. ह्या प्रसंगी ‘आमरा मिले छि आज मायेर डाके’ (आईच्या हाकेच्या आज आपण जमलो आहोत) ह्या त्यांच्या कवितेच्या गायनाने अधिवेशनाला जमलेले प्रतिनिधी अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांचा कडि ओ कोमल हा संग्रहही याच काळातील. आदी ब्राह्म समाजाच्या कार्यातही त्यांनी उत्साहाने भाग घेऊन समाजाच्या माघोत्सवासाठी धर्मसाधकाच्या अंतरातील व्याकुळ भाव व्यक्त करणारी सव्वीस नवीन गाणी रचून त्यांना चाली दिल्या होत्या.
ह्या वर्षीच्या इतर रचनांमध्ये धार्मिक आणि सामाजिक कालबाह्य आचार विचारांचा पाठपुरावा करणाऱ्‍याचे विडंबन करणाऱ्‍या काही विनोदी नाटिका लिहून त्यांनी विरोधकांचा रोषही ओढवून घेतला. साहित्यदृष्ट्या ह्या नाटिकांना विशेष महत्त्व नसले, तरी तरुण रवींद्रनाथांची धर्मसुधारणेच्या बाबतची तडफ यांतून प्रत्ययाला येते. १८८७ ते १८९० ह्या काळातील मानसी (१८९०) हा काव्यसंग्रह, मायार खेला (१८८८) ही संगीतिका आणि राजा ओ रानी (१८८९) हे नाटक अशासारखी रचना पाहिल्यानंतर त्यांच्या साहित्यनिर्मितीत एक निराळे परिवर्तन आढळते.
ही कलासाधना चालू असताना सामाजिक परिवर्तनासाठी बंगालमध्ये चालू असलेल्या चळवळीशी त्यांनी संबंध ठेवला होता. १८८८ साली त्यांचे ज्येष्ठ पुत्र रथींद्रनाथ यांचा जन्म झाला. १८८९ साली सोलापुरातील आपले बंधू सत्येंद्रनाथ यांच्या घराचा मुक्काम आटोपून परतताना त्यांनी पुण्याला पंडिता रमाबाईंचे व्याख्यान ऐकले. पुराणमतवादी लोकांनी आरडाओरडा करून ते व्याख्यान बंद पाडलेले पाहून ते अत्यंत व्यथित झाले. त्यांनी स्त्री स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांना चालना देणारा लेख लिहिला. नंतरच्या काळात स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाही त्यांनी पुरस्कार केला. नव-वंग-आंदोलनावरही एक निबंध याच सुमाराला लिहिला आणि लॉर्ड क्रॉस ह्याच्या भारतविरोधी धोरणाचा समाचार घेतला. १८९० साली इंग्लंडचा तीन महिन्याचा दौरा आटपून ते परतले. याच वर्षी जोडासाँको येथील वाड्यात त्यांनी लिहिलेल्या विसर्जन (१८९०) नाटकाचा प्रयोग झाला. त्यातील रघुपतीची भूमिका त्यांनी स्वतः केली होती. देवेंद्रनाथांनी उत्तर बंगालमधील तीन परगण्यांत पसरलेल्या जमीनदारीची व्यवस्था आता त्यांच्यावर सोपवली. जमिनदारीची कामे पाहताना रवींद्रनाथांनी रयतेच्या हिताची नवीन कामे सुरू केली. १८९० ते १९०० अशी दहा वर्षे त्यांनी ग्रामीण विभागात काढली. १८९१ साली शिलाइदह ह्या गावी त्यांची दुसरी कन्या रेणुका हिचा जन्म झाला. जमिनदारीच व्यवस्था पाहण्याच्या कामामुळे बंगालच्या ग्रामीण जीवनाशी त्यांचा खूप जवळून परिचय झाला. त्या अनुभवातूनच त्यांच्या उत्कृष्ट कथांचा जन्म झाला. हितवादी नावाच्या साप्ताहिकातून त्या दर आठवड्याला प्रसिद्ध होत गेल्या. १८९१ साली त्यांनी साधना मासिक सुरू करून आपला पुतण्या सुधींद्रनाथ याला संपादक नेमले. त्यातूनशोनार तरी (१८९४), पंचभूतेर डायरी (पंचभूत–१८९७) यांसारखे त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले, १८९४ साली त्यांनी संपादनाची सूत्रे स्वतःकडे घेतली आणि ती १८९५ साली ते मासिक बंद पडेपर्यंत सांभाळली. आपली पुतणी इंदिरा देवी हिला लिहिलेली आणि त्यानंतर छिन्नपत्र (१९१२) या नावाने संगृहित झालेली त्यांची अप्रतिम पत्रे ह्याच मासिकातून प्रथम प्रसिद्ध झाली.
मीरा हिचा १८९३ साली आणि कनिष्ठ पुत्र शमींद्र याचा १८९४ साली जन्म झाला. १८९३ साली बंकिमचंद्र चतर्जींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका जाहीर सभेत ‘राष्ट्रीय विकासाचा मूलभूत पाया ग्रामीण विकास हा आहे’ हा विचार त्यांनी ‘इंग्रज ओ भारतवासी’ ह्या आपल्या लिखित भाषणातून मांडला. मातृभाषेतून शिक्षण, स्वावलंबन आणि स्वाभिमान हा स्वदेशी चळवळीचा कणा आहे, हा विचार त्यांनी या प्रसंगी सांगितला. कथा ओ काहिनी (१९०८) मध्ये भारतीय इतिहासातील वीरकथा त्यांनी कवितेत गुंफल्या. बंगाली ‘शब्द व छंद’ ह्या संबंधातील त्यांचे बहुमोल लेखनही ह्याच काळातील आहे. १८९६ च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनात बंकिमचंद्राच्या ‘वंदेमातरम्’ ह्या गीताला रवींद्रनाथांनी चाल दिली व ते गीत स्वतः म्हटले. राष्ट्रीयसभेत ‘वंदेमातरम्’ गायिले जाण्याचा हा पहिला प्रसंग. पुढल्याच वर्षी नटोर येथे काँग्रेसचे प्रादेशिक अधिवेशन भरले असताना रवींद्रनाथांनी बंगालीतून भाषण करून प्रतिनिधींना आश्चर्याचा धक्का दिला.
मुक्त वातावरणात, निसर्गसान्निध्यात आणि गुरुजनांबरोबर राहून उपनिषदांच्या काळात जसे शिक्षण चालत असे, त्या पद्धतीचा प्रयोग करण्याच्या विचारातून महर्षी देवेंद्रनाथांनी बोलपूरजवळ बांधलेल्या ‘शांतिनिकेतन’ बंगल्यात १९०१ साली त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. ती इमारत व सारी जमीन महर्षींनी एक विश्वस्त निधी स्थापून शाळेला देऊन टाकली. नैवेद्य(१९०२) ह्या कविता संग्रहातील त्यांच्या कवितांतून हा मुक्त मनाने सारे जीवन समजून घेण्याचा ध्येयवाद प्रकट झाला आहे (‘चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर’ ही सुप्रसिद्ध प्रार्थना ह्याच संग्रहात प्रसिद्ध झाली). ह्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनीवंगदर्शन ह्या बंकिमचंद्रांनी स्थापन केलेल्या नियतकालिकांचे संपादकत्व स्वीकारले. चोखेर बाली (१९०३) ही त्यांची भारतीय भाषांतली पहिली म्हणता येईल अशी मनोविश्लेषणात्मक कादंबरी वंगदर्शनातूनच क्रमशः प्रसिद्ध झाली. चिरकुमार सभा(१९२६) हे विनोदी नाटकही याच वर्षी लिहून त्यांनी भारतीतून प्रसिद्ध केले. ऑक्टोबर महिन्यात ते शिलाइदहहून सहकुटुंब शांतिनिकेतनात आले आणि तपोवन पद्धतीची शाळा सुरू करण्याच्या कार्याला अधिक नेटाने लागून २२ डिसेंबर १९०१ ह्या दिवशी वडिलांचा आशिर्वाद घेऊन त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर आलेल्या पहिल्या शिक्षकांत ब्रह्मबांधव उपाध्याय, रेवाचंद, जगदानंद राय, शिवधन विद्यारण्य आणि लॉरेन्स हे इंग्रज गृहस्थ होते.
नवीन आश्रमशाळा सुरू झाल्याच्या काळात त्यांना अनेक आर्थिक आणि कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. १९०२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या पत्नींना गंभीर दुखणे झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी वयाच्या अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढल्याच वर्षी त्यांची कन्या रेणुका वारली (१९०३). सतीशचंद्र राय ह्या बुद्धिमान आणि त्यागी सहकारी मित्रालाही तरुण वयात मृत्यू आला. ह्या साऱ्‍या आपत्तींना तोंड देत असताना देशातील राजकीय चळवळींत त्यांचे सहकार्य चालू होते. ‘स्वदेशी समाज’ हा ग्रामीण पुनर्रचनेसंबंधीचा सुप्रसिद्ध निबंध याच वर्षी त्यांनी लिहिला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून ‘शिवाजी उत्सव’ सुरू केला आणि ‘शिवाजी’ ही देशभक्तीला प्रेरणा देणारी स्फूर्तिदायक दीर्घ कविताही लिहिली. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके लिहिली. नौकाडुबी (१९०६) ही कादंबरीही ह्याच काळात क्रमशः प्रसिद्ध होत होती. १६ मार्च १९०५ रोजी महर्षी देवेंद्रनाथांचे निधन झाले.
लॉर्ड कर्झन यांनी १९०५ मध्ये केलेल्या वंगभंगाच्या निर्णयाविरुद्ध देशभर प्रतिकाराची चळवळ सुरू झाली होती. बंगालच्या अभेद्यतेचे प्रतिक म्हणून रवींद्रनाथांनी ‘रक्षाबंधना’चा विराट कार्यक्रम हाती घेतला. याच वर्षी ‘प्रिन्स ऑफ वेल्स्’ यांनी भारताला भेट दिली. त्यांच्या स्वागत समारंभावर कठोर टीका करणारे लेखही त्यांनी लिहिले.
वंगभंगाच्या चळवळीला घातपाताचे स्वरूप येऊ लागल्यामुळे त्यांनी त्यातून लक्ष काढून घेऊन ग्रामीण भागातील विधायक कार्य व शांतिनिकेतनातील जीवनशिक्षणकार्याकडे ते केंद्रित केले. १९०७, साली वंगीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ह्या काळात सुप्रसिद्ध बंगाली संपादक रामानंद चतर्जी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढत गेला आणि प्रवासी ह्या त्यांच्या मासिकातून त्यांची गोरा (१९१०) ही पुढे जागतिक लौकिक मिळवलेली कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली. याच वर्षी त्यांचा कनिष्ठ पुत्र शमींद्रनाथ वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कॉलरा होऊन वारला. १९०९ साली लिहिलेल्या प्रायश्चित ह्या नाटकात धनंजय बैरागी ह्या पात्राकरवी त्यांनी असहकार आणि अहिंसात्मक प्रतिकाराचे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते नंतरच्या काळातील गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी जुळणारे आहे. राजा (१९१०) हे रुपकात्मक नाटकही त्यांनी याच वर्षी लिहिले. ज्येष्ठपुत्र रथींद्रनाथ १९१० साली अमेरिकेहून परतल्यावर त्याचा प्रतिमा देवी ह्या बालविधवेशी विवाह केला.
शांतिनिकेतनातील रहिवाशांनी त्यांचा पन्नासावा वाढदिवस १९११ साली साजरा केला. प्रवासीमधून त्यांच्या जीवनस्मृती क्रमशः प्रसिद्ध होत होत्या आणि गीतांजलीतून (१९१२) संगृहीत झालेल्या मूळ कविता व डाकघर (१९१२) हे नाटकही याच काळात लिहिले गेले. २७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्त्यात राष्ट्रीय सभेचे सव्विसावे अधिवेशन भरले असताना ‘जणगणमन-अधिनायक जय हे भारत-भाग्यविधाता’ हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत पहिल्या प्रथम गायले गेले. त्यानंतर माघोत्सवांत हे गीत ब्रह्मसंगीत म्हणून गात असत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या गीताचा ‘राष्ट्रगीत’ म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला.
इंग्लंडमधील स्नेह्यांकडून त्यांना समानशील इंग्रज साहित्यप्रेमी लोकांना भेटण्याविषयी आग्रहाची निमंत्रणे येत होती. त्यांनी जाण्याचे ठरवले; परंतु ऐनवेळी आजारी पडल्यामुळे बेत रद्द केला व ते शिलाइदह येथे हवापालट करण्यासाठी गेले. ह्या ठिकाणी त्यांनी गीतांजलीत आलेल्या बंगाली कवितांचे स्वतः इंग्रजीतून भाषांतर केले. १९१२ च्या मे महिन्यात ते इंग्लंडला गेले. तेथे सुप्रसिद्ध चित्रकार रोदेन्‌स्टाइन यांनी ते वाचायची इच्छा प्रकट केल्यावरून ते त्यांच्या हाती दिले. त्यांनी श्रेष्ठ कवी डब्ल्यू. बी. येट्स ह्यांच्याकडे त्या रत्नाची पारख सोपवली. येट्स कविता वाचून मुग्ध झाले [⟶ बंगाली साहित्य]. पुढे अनेक नामवंत इंग्रज साहित्यिकांशी त्यांचा परिचय झाला. दीनबंधू सी. एफ्. अँड्र्यूज यांची पहिली भेट याच वेळी झाली आणि पुढे ते त्यांचे आजन्म स्नेही आणि सहकारी झाले. रॉयल आल्बर्ट हॉल ह्या प्रख्यात नाट्यगृहात त्यांच्या ‘दालिया’ नावाच्या कथेवरून इंग्रजीत रचलेल्या ‘महारानी ऑफ आराकान’ ह्या एकांकिकेचा प्रयोग झाला.
लंडनहून ते अमेरिकेत गेले. गीतांजलीच्या इंग्रजी आवृत्तीचे उत्तम स्वागत झाल्याची वार्ता त्यांना कळली. येट्सनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली होती. १९१३ च्या नोव्हेंबरात शांतिनिकेतनला ते परतले. १३ नोव्हेंबरला त्यांच्या गीतांजलि ह्या काव्यसंग्रहाला स्वीडिश अकॅडेमीने नोबेल पारितोषिक दिल्याची वार्ता कळली. साहित्यासाठी हे पारितोषिक मिळवलेले रवींद्रनाथ हे पहिले आशियाई लेखक होत. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच कलकत्ता विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानदर्शक पदवी देण्याचा ठराव केला होता. प्रत्यक्ष समारंभ २६ डिसेंबरला झाला. त्यांच्या पुस्तकांची यूरोपातील महत्त्वाच्या भाषांतून तसेच भारतीय भाषांतूनही भाषांतरे होऊ लागली. आंद्रे झीद (फ्रेंच), झेनोबिया येमेनेझ (स्पॅनिश) यांच्यासारखे श्रेष्ठ यूरोपीय लेखक त्यांना भाषांतरकार म्हणून लाभले.
यूरोपात ४ ऑगस्ट १९१४ रोजी पहिल्या जागतिक महायुद्धाचा वणवा पेटला. ५ ऑगस्टला ‘मा मा हिंसी :’ ह्या विषयावर जगावर कोसळत असलेल्या ह्या द्वेषमूलक विध्वंसासंबंधी त्यांनी तळमळीने भाषण केले. त्यानंतरच्या सेहेचाळीस दिवसांत त्यांनी गीताली (१९१४) साठी एकशेआठ गाणी रचून ती स्वरबद्ध केली. शबूज पत्र (हिरवी पाने) ह्या नियतकालिकाचे ⇨ प्रमथ चौधुरी यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशन सुरू झाले. येथून बंगाली साहित्याला नवीनच वळण लागले. रवींद्रनाथांच्या प्रतिभेचा एक नवीनच आविष्कार शबूज पत्र ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणाऱ्‍या बलाका (१९१६) ह्या काव्यसंग्रहात नंतर ग्रथित झालेल्या कवितांतून व ‘सबूजेर अभियान’ सारख्या काव्यातून; चतुरंग (१९१६), घरे बाइरे (१९१६) सारख्या कादंबऱ्‍यांतून व अनेक निबंधांतून प्रकट होऊ लागला.
त्यांना ब्रिटिश सम्राटाकडून १९१५ साली ‘सर’ (नाइटहुड) हा किताब देण्यात आला आणि याच वर्षी सी. एफ्. अँड्र्यूज यांनी शांतिनिकेतनात त्यांची आणि गांधीजींची भेट घडवून आणली. या वर्षीच्या परदेश दौऱ्‍यांत युद्धाची आसुरी धुंदी चढलेल्या जपान व अमेरिकेतील जनसमुदायांपुढे त्यांनी विश्वशांतीच्या प्रचाराची भाषणे केली. त्याबद्दल अवहेलनाही सहन केली. भारतात परतल्यानंतर ॲनी बेंझट ह्या भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्‍या थोर आयरिश महिलेच्या अटकेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षपद ॲनी बेंझटना मिळावे, यासाठी प्रचार केला. ह्या अधिवेशनात केलेल्या ‘कर्ताय इच्छाय कर्म’ ह्या त्यांच्या ओजस्वी देशभक्तिपर भाषणामुळे स्वदेशी युगातील राष्ट्रप्रेमी रवींद्रनाथांचे दर्शन जनतेला घडले. ह्या अधिवेशनात उत्साहाने भाग घेत असताना त्यांनी डाकघर ह्या नाटकाचा प्रयोग बसवून तो आपल्या वाड्यात, आमंत्रित सदस्यांपुढे करून दाखवला. हा प्रयोग पाहण्यासाठी लो. टिळक, पं. मदन मोहन मालवीय, गांधीजी प्रभृती थोर पुढारी हजर होते.
त्यांची सर्वांत थोरली कन्या माधुरीलता (बेला) हिचे १९१८ साली निधन झाले. त्यानंतर सु. चार महिने शांतिनिकेतनातील शिक्षणकार्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. ‘यंत्र विश्वं भवत्येक नीडम्’ ह्या भावनेने स्थापन केलेल्या ‘विश्वभारती’ ह्या संस्थेंची २२ डिसेंबर १९१८ रोजी पायाभरणी झाली. ‘भारतवर्षातील शिक्षणपद्धतीने वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन, मुसलमान इ. सर्व विचार एकत्र आणले पाहिजेत व ही विचारसंपत्ती एका ठिकाणी संगृहीत करायला पाहिजे’, हा विचार ह्या स्थापनेच्या मुळाशी होता. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील संस्कृतींच्या अभ्यासाचे आणि संशोधनाचे ते केंद्र व्हावे आणि देश, राष्ट्र इ. मर्यादांचे उल्लंघन करून भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील मानवाची प्रगती ही त्या केंद्राच्या विकासाची दिशा रहावी, हे त्यामागील ध्येय होते.
ब्रिटिश सरकारने १९१९ साली पंजाबातील जालियनवाला बागेत केलेल्या अमानुष हत्याकांडामुळे ‘दहशतीच्या धसक्याने मूक झालेल्या माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या निषेधाला वाचा फोडण्यासाठी’ आपण हा किताब परत करीत आहोत असे व्हाइसरॉयना कळवून ‘सर’ हा किताब त्यांनी परत केला. विश्वभारतीला आर्थिक साहाय्याची मागणी करण्यासाठी त्यांनी भारताचा दौरा सुरू केला. देशातील प्रमुख शहरांतून व्याख्याने दिली, नाट्यप्रयोग केले, वयाची साठी उलटली असतानाही स्वतः त्यातून भूमिका केल्या. २० सप्टेंबर १९२२ रोजी पुण्यातील किर्लोस्कर नाट्यगृहात ‘भारतीय प्रबोधना’वर त्यांचे भाषण झाले आणि सार्वजनिक जाहीर सभेत त्यांनी लो. टिळकांना श्रद्धांजली वाहिली. विश्वभारतीच्या कार्यासाठी काढलेल्या यूरोप-अमेरिकेच्या दौऱ्‍याप्रमाणे आग्नेय आशियातील देशांतही त्यांनी दौरा काढला व जाव्हा, बाली वगैरे बेटांपर्यंत जाऊन तेथील नृत्य, नाट्य, गायन, धार्मिक पूजाविधी यांतून लाभलेले सांस्कृतिक धन त्यांनी गोळा करून आणले. तेथील ‘बाटिक’ कला रवींद्रनाथांनी आपल्या बरोबरचे चित्रकार सुरेंद्रनाथ कार यांना शिकायला लावून शांतिनिकेतनात त्या कलेचे शिक्षण देणारा विभाग उघडला. तो अद्यापही चालू आहे.
विश्वभारतीत फ्रेंच प्राच्यविद्यापंडित सिल्व्हँ लेव्ही, श्रीलंकेतील बौद्ध तत्त्वज्ञानविशारद धर्माधार राजगुरू महास्थविर, विधुशेखर भट्टाचार्य (संस्कृत पंडित), दिनेंद्रनाथ टागोर (रवींद्रसंगीतज्ञ), भीमराव शास्त्री हसूरकर (अभिजात हिंदुस्थानी संगीतज्ञ), ⇨नंदलाल बोस (चित्रकार), रवींद्रनाथ टागोर (कृषितज्ज्ञ) यांच्यासारख्यांनी कला आणि ज्ञानाच्या विविध शाखांचे नेतृत्व स्वीकारले. तिबेटी, चिनी यांसारख्या आशियाई भाषांचा अभ्यास सुरू झाला.
अहमदाबादला १९२० साली गुजराती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्या रात्री त्यांचा मुक्काम साबरमतीला गांधीजींच्या आश्रमात होता. १९२१ साली गांधीजींनी असहकाराची चळवळ सुरू केली. जनतेच्या आंदोलनाला जर तितक्याच प्रबळ विधायक कार्याची जोज नसली, तर त्या आंदोलनाला अनिष्ट वळणे लागतात, अशी रवींद्रनाथांची धारणा होती. ह्या बाबतीत त्यांचा गांधीजींशी मतभेद होता. बोलपूर जवळील सुरूल गावी ‘श्रीनिकेतन’ ही शेतकी शिक्षणाचे कार्य करणारी संस्था १९२२ मध्ये सुरू केली. सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्याबरोबर श्रीनिकेतनात ग्रामीण विकासाचे विधायक कार्य पिअर्सन आणि लेओनार्ड एल्महर्स्ट ह्या ध्येयवादी इंग्रज शेतकी तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यांनी सुरू केले होते. खेड्यापाड्यांत पसरलेल्या मलेरिया रोगाच्या उच्चाटणापासून तो जपानी तज्ज्ञांच्या साहाय्याने चर्मोद्योग, कुटिरोद्योग चालवण्यापर्यंत ग्रामीण जनतेच्या स्वास्थ्य आणि सुखासाठी आवश्यक असणाऱ्‍या अनेक कार्यांचे प्रयोग श्रीनिकेतनात रवींद्रनाथांच्या देखरेखीखाली चालू होते. त्याचबरोबर मुक्तधारा (१९२२), रक्तकरवी (१९२४) यांसारख्या नवीन नाटकांचे प्रयोग, निरनिराळ्या ऋतूंच्या उत्सवांचे आयोजनही ते करीत होते. एवढेच नव्हे, तर आत्मसंरक्षणार्थ शांतिनिकेतनातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना जपानी तज्ज्ञांकडून ⇨जूदो ह्या कुस्तीचे शिक्षणही सुरू केले होते. रवींद्रनाथांनी होमिऑपथी आणि जीवरसायनशास्त्र यांचा उत्तम अभ्यास करून स्वतः रोगनिवारणाच्या कार्यात भाग घेतला होता. जीवनातील मानवहिताचे कुठलेही अंग त्यांनी गौण मानले नाही. १९३० साली ऑक्सफर्डला ‘मानवाचा धर्म’ ह्या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्याच वेळी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविले गेले. उतार वयात त्यांनी चित्रकलेची आराधना सुरू केली. त्यातूनही रंगरेषांतील अभिव्यक्तीचे त्या कलेच्या क्षेत्रात त्यांनी नवीन दालन उघडले. हे प्रदर्शन यूरोपातील फ्रान्स, इंग्लंड, जर्मन, सोव्हिएट रशिया आणि अमेरिकेतील अनेक प्रमुख शहरांतून भरवले गेले.
कलकत्यातील अनेक संस्थांतर्फे १९३१ साली त्यांचा सत्तरावा वाढदिवस साजरा झाला. पुढल्याच वर्षी त्यांनी इराण व इराकचा दौरा केला. तेथून परतल्यानंतर कलकत्ता विद्यापीठाच्या रामतनू लाहिरी अध्यासनाच्या प्राध्यापक पदावर त्यांची नियुक्ती होऊन विद्यापीठाने ६ ऑगस्ट रोजी त्यांना मानपत्र दिले. याच सुमारास बंगाली कवितेत त्यांनी नव्यानेच मुक्तछंदाचा प्रयोग सुरू केला होता. त्या कवितांचा पुनश्च (१९३२) हा संग्रह होय. देशातील अल्पसंख्यांकांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या ब्रिटीश सरकारच्या निर्णयाविरुद्ध गांधीजींनी वीस सप्टेंबरपासून येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. इतर राजकीय नेतेही बंदिवासात होते. रविंद्रनाथांनी गांधीजींच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांना गांधीजींच्या उपोषणाची चिंता वाटून ते पुण्याला गेले. त्याच वेळी येरवडा तुरुंगात पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांनी वाटाघाटी करण्याचे मान्य केल्याची बातमी आली. गांधीजींनी उपोषण सोडले त्या प्रसंगी रवींद्रनाथ तेथे हजर होते. दुसऱ्‍या दिवशी तिथीप्रमाणे गांधीजींचा जन्मदिन होता. पुण्यातील शिवाजी मंदिरात पंडित मालवीय ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभिनंदनपर प्रचंड सभेत रवींद्रनाथांचे ‘जातीयता आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन’या विषयावर भाषण झाले.
संगीत-नृत्य आणि मूकाभिनय ह्या तिन्ही कलांच्या एकत्रीकरणातून चित्रांगदा (१८९२) नाटकाचे पुनर्लेखन करून त्यांनी प्रयोग केला (१९३३). ‘परिशोध’ कवितेला संगीत-नाट्यरूप दिले आणि श्यामा (१९३९) हे नवीन नृत्यनाटक लिहून त्याचा कलकत्त्याच्या रंगमंचावर प्रयोग केला. कठोर राज्यशासनामुळे माणसाचे आवडीनिवडीचे स्वातंत्र्य जाऊन त्याचे जीवन शुष्क होते. माणसे अल्पसंतुष्ट आणि भित्री होतात. जीवनाला अवकळा येते. हा विचार सांगणाऱ्‍या ताशेर देश (१९३३, म. शी. पत्त्यांचा देश) ह्या त्यांच्या प्रयोगदृष्ट्या यशस्वी अशा संगीत नाटकाचा प्रयोगही याच वर्षी कलकत्त्यात झाला. १९३७ साली कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या प्रवक्तेपदावरून, तोपर्यंतची इंग्रजीतून भाषण करण्याची प्रथा मोडून, त्यांनी बंगालीतून भाषण केले. १९३६ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या विनंतीवरून, माणसाचे जन्मसिद्ध हक्क जतन करण्यासाठी स्थापन केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य संघाचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले.
हिटलरने १९३८ साली चेकोस्लोव्हाकियावर हल्ला केला. प्राग येथील आपले मित्र व्ही. लेस्नी यांना पत्र पाठवून रवींद्रनाथांनी ह्या आक्रमणाचा कडाडून निषेध केला. जपानेही चीनवर हल्ला केला होता. त्यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त करणारी पत्रे त्यांनी जपानमधील श्रेष्ठ कवी नोगुची यांना पाठवली.
दुसऱ्‍या महायुद्धाने १९४० सालापासून अतिशय उग्र स्वरूप धारण केले. विश्वशांतीच्या आणि मानवतेच्या कल्पनांचा वृद्ध रवींद्रनाथांना त्यांच्या डोळ्यापुढे विध्वंस होताना दिसत होता. याच वर्षी गांधीजींनी शांतिनिकेतनला भेट दिली. गांधीजींना निरोप देताना रवींद्रनाथांनी त्यांच्या हाती एक पत्र दिले. ‘माझ्या आयुष्यातल्या अमोल धनाचा साठा वाहून नेणाऱ्‍या जहाजासारख्या असणाऱ्‍या विश्वभारतीचा भार माझ्यामागून आपण सांभाळा’ अशी त्या पत्रात गांधीजींना विनंती केली होती. गांधीजींनी ते पत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांना दिले. १९५१ साली मौलाना अबुल कलाम आझाद स्वतंत्र भारतातील केंद्रीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर विश्वभारतीचा आर्थिक भार भारत सरकारने स्वीकारला. १९४० च्या ऑक्टोबरात ऑक्सफर्ड विद्यापीठाने शांतिनिकेतनात आपले प्रतिनिधी पाठवून सर मॉरिस ग्वियर (तत्कालीन सरन्यायाधीश) यांच्या हस्ते त्यांना ‘डॉक्टरेट’ची सन्माननीय पदवी देण्याचा खास समारंभ घडवून आणला.
त्यांचा ऐंशीवा वाढदिवस १४ एप्रिल १९४१ रोजी शांतिनिकेतनात साजरा झाला. मूत्रपिंडाच्या विकारामुळे प्रकृती खूपच ढासळली होती. तरीही ह्या प्रसंगी आपला संदेश म्हणून ‘सभ्यतार संकट’ (संस्कृतीवरील गडांतर) ह्या शीर्षकाखाली त्यांनी एक निबंध लिहिला. ऐंशीव्या वर्षी प्रकृती आणि भोवतालची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही रुग्णशय्येवरील रवींद्रनाथांनी आपल्या बालपणाच्या स्मृतींचा छेलेबेला (१९४०, म. शी. बालपण) हा अत्यंत हृदयंगम असा छोटेखानी ग्रंथ लिहिला. ‘ऐकतान’ ही त्यांची सुप्रसिद्ध कविता त्याच काळातील आणि जन्मदिने (१९४१) हा शेवटला कवितासंग्रहही याच काळातील होय.
त्यांची प्रकृती १९४१ च्या जून अखेरीला फारच ढासळली. डॉक्टरांनी कलकत्त्याला उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. ३० जुलैला शस्त्रक्रिया होण्याच्या काही तास आधी त्यांनी आयुष्यातील शेवटची कविता लिहून घ्यायला सांगितली. आपल्या जीवनदेवतेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले हे शेवटचे अर्घ्य. कृती आणि उक्ती यांतील अद्वैत आचरणातून सिद्ध करणाऱ्‍या, उपनिषदांच्या अभ्यासाला अनुसरून पिंडी ते ब्रह्मांडी पाहणाऱ्‍या, साहित्य, संगीत, कला, आणि विचारांचे बहुविध आणि बहुमोल भांडार अवघ्या मानवतेला देणाऱ्‍या, ह्या विश्वकवीची प्राणज्योत ७ ऑगस्ट १९४१ रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी मालवली.
त्यांच्या जन्मशताब्दीचा उत्सव १९६१ साली जगभर साजरा झाला. त्या प्रसंगी देशोदेशींच्या तत्त्वज्ञांनी, कवी-कलावंतांनी आणि राष्ट्र धुरीणांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे लेख लिहिले. त्या प्रसंगी जवाहरलाल नेहरूंनी म्हटले आहे, ‘प्राचीन काळातील ज्ञानातून स्फूर्ती घेऊन अर्वाचीन काळाला उपयुक्त असा साज देणारे आणि ते ज्ञान सार्थ करणारे असे भारतीय द्रष्ट्यांच्या परंपरेतील ते एक ऋषी होते. त्यांनी अस्सल भारतीय परंपरेतील संदेश आजच्या युगधर्माला अनुरूप असणाऱ्‍या नव्या भाषेत दिला. हा थोर आणि उत्कट संवेदनाशीलता असणारा माणूस केवळ भारताचाच कवी नव्हते, तर साऱ्‍या मानवतेचा व सार्वजनिक स्वातंत्र्याचा कवी होते. त्यांचा संदेश आपण सर्वांसाठी आहे’. 

🙏🙏

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे


बालकवी ठोंबरे 
जन्म. १३ ऑगस्ट १८९०
बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.
बालकवींच्या निसर्ग कविता पाठ नाहीत, असे पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्रात क्वचितच घर होते. त्या काळात ‘सेव्ह’ नव्हतं. जे काही होतं ते पाठांतर. त्यामुळेच श्रावण संपत आला की, बालकवी आठवतात. त्यांचा इंद्रधनू आठवतो. त्यांची आनंदी आनंद गडे घडाघडा पाठ म्हटली जाते. जीवनाचा आनंद बालकवींना सर्वत्र दिसला. वाहणा-या वा-यावर, दशदिशांत आणि जगात सुद्धा आणि एवढा सगळा आनंद जीवनात अनुभवल्यानंतर तो शिल्लकही राहिला. द्वेष संपला, मत्सर गेला आणि जिकडे तिकडे आनंद उरला. बालकवींचे जीवन किती सुंदर होते, याची ही कविता म्हणजे साक्ष आहे. 
बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैत्यनाचा प्रत्यय येतो .नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय सांगितले जाते. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना ‘निसर्गकवी ’म्हटले जाते. फुलराणीचे वर्णन करताना ते म्हणतात.
"हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फ़ुलराणी ही खेळ्त होती"
*बालकवी ठोंबरे* यांचे निधन ५ मे १९१८रोजी झाले.

रवि वर्मा

 त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार राजा रवि वर्मा 
जन्म. २९ एप्रिल १८४८
राजा रवि वर्मा यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात. रविवर्म्याचा जन्म केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्याचे वडील मोठे विद्वान व आई ही कवयित्री होती. त्याच्या आईने लिहिलेले काव्य, 'पार्वती स्वयंवर' हे रविवर्मा यांनी त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध केले. राजा रवि वर्माला सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती.त्याच्या बालपणीच त्याला महाराज अलियम् तिरुनल या त्याच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला. राजा रविवर्मा यांचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्य प्रोत्साहनामुळे त्यांना अधिकच प्रेरणा मिळाली. १८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रविवर्म्याने सुवर्णपदक मिळवले. महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्याने तैलचित्रे काढण्याचे ठरवले. राजा रविवर्म्याच्या चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्याचा स्टुडिओ महाराष्ट्रात लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्याने तशाच स्त्रिया चित्रांत रंगवल्या. १८७३ मध्ये, व्हिएन्ना येथे झलेल्या कला प्रदर्शनात त्याला मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे तो जागतिक क्षेत्रावर प्रकाशझोतात आला. राजा रविवर्म्याने चित्रांतील विविध विषयासाठी भारतभर प्रवास केला. त्याचे 'दुष्यंत व शकुन्तला','नल व दमयंती, या विषयावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच्या चित्रांनी भारतीयांस त्यांच्या धर्मग्रंथांतील द्दष्ये डोळ्यासमोर साकार झाली. ही त्याची चित्रे सर्व भारतभर प्रसिद्ध झाली. आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रविवर्मा यांचे नाव घेतले जाते. युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्र्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे छापखाना उभारला. या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रं साऱ्या भारतभर पूजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रविवर्मा यांनी केले. आपल्या चित्रांतून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणाऱ्या रविवर्माना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळणारे ते एकमेव. सातव्या एडवर्डने कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रविवर्माच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविल्या. भारतीय कलेच्या इतिहासात तो उत्कृष्ट चित्रकारांपैकी एक समजला जातो.
१९०४ मध्ये, भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केसर-इ-हिंद या सुवर्णपदकाने सन्मानित केले. त्यावेळेस त्याचे नांव 'राजा रवि वर्मा' असे नोंदविलॆ गेले. मावेलिकरा, केरळ येथे त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. पुण्यातही नवोदित चित्र-कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे राजा रविवर्मा कलापीठ आहे. *मा राजा रविवर्मा* यांचे २ ऑक्टोबर १९०६ रोजी निधन झाले.

लेखिका,गायिका, नाट्यअभिनेत्री माधुरी पुरंदरे

 लेखिका,गायिका, नाट्यअभिनेत्री  माधुरी पुरंदरे  
जन्म.२९ एप्रिल १९५२
माधुरी पुरंदरे या अतिशय दर्जेदार आणि सहजसोप्या लिखाणातून लहान मुलांना वाचनाची गोडी लावून, पुस्तकांकडे ओढून नेणाऱ्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्या उत्तम गायिका, तसंच नाट्यअभिनेत्रीही आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे वडील आणि समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाड्यांवर काम करणाऱ्या समाजसेविका निर्मला पुरंदरे ह्या त्यांच्या आई. माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी फ्रेंच भाषेचा डिप्लोमाही केला. पुढे अनेक वर्षे त्यांनी अलीओंस फ्रांसेज संस्थेमध्ये फ्रेंच भाषा शिकवण्याचे कार्य केले. चित्रकला आणि साहित्य या दोनही क्षेत्रांत उत्तम गती असणार्या् माधुरी पुरंदरे यांनी बाल व कुमारांसाठी विपुल लेखन केले आहे. ‘आमची शाळा’, ‘राधाचं घर’, ‘यश संच’, ‘सख्खे शेजारी’, ‘पाचवी गल्ली’, अशा पुस्तकांतून त्यांनी मुलांच्या भावविश्वाचा आणि त्यांच्या आसपासच्या परिसराचा घेतलेला शोध मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही भावणारा ठरला आहे. ‘वाचू आनंदे’ या पुस्तक-संचातून चांगल्या मराठी साहित्यातील निवडक वेच्यांची आणि त्या आधारे देशभरातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांची आणि विविध चित्रशैलींची त्यांनी ओळख करून दिली. मुलांना भाषाभ्यासाची गोडी लागावी, त्यांची व्याकरणाची जाण वाढावी या हेतूने लिहिलेला ‘लिहावे नेटके’ हा पुस्तक-संच मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांसाठीही भाषेचा अभूतपूर्व मार्गदर्शक ठरला. मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही त्यांनी उत्तम साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांनी मराठीत लिहिलेल्या पिकासोच्या चरित्राला कोठावळे पुरस्कार मिळाला. मराठीतील कोसला, वाडा चिरेबंदी, बलुतं अशा दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे तर वेटिंग फॉर गोदो, लस्ट फॉर लाइफ, हॅनाज सूटकेस अशी जगप्रसिद्ध पुस्तके मराठीत आणली आहेत. आमची शाळा, बाबाच्या मिश्या, हॅनाची सुटकेस, हात मोडला, जादुगार आणि इतर कथा, कोकरू, फ्लॅट नंबर थर्टी सिक्स, लिहावे नेटके, मासोळी आणि चिमुकलं पाखरू, मोठी शाळा, मुखवटे, पाचवी गल्ली, शाम्याची गंमत व इतर कथा, सिल्व्हर स्टार, सुपरबाबा, Yash Big School, Yash Guest, झाडं लावणारा माणूस, चित्रवाचन, कंटाळा, मामाच्या गावाला, मोतिया, सख्खे शेजारी, वाचू आनंदे, व्हिन्सेट व्हॅन गॉग, परी मी आणि हिप्पोपोटॅमस, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. बालसाहित्यातील त्यांच्या एकंदर योगदानाबद्दल २०१४ साली साहित्य अकादमीने त्यांना सन्मानित केले आहे.

कादंबरीकार व कथाकार प्रा. राम शेवाळकर

 कादंबरीकार व कथाकार प्रा. राम शेवाळकर यांचा 
जन्म. २ मार्च १९३१ अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात
कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत काही काळ ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. १९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता. प्रा.शेवाळकर यांनी अनेक ग्रंथांचे अनुवाद केले. महाकवी भास यांच्या नाट्यावर आधारित ' अग्निमित्र ' हे त्यांचे विशेष पुस्तक. याशिवाय अभिज्ञान शाकुंतल, भासाची भारतनाट्य, प्रतिज्ञायौगंधरायण, स्वप्नवासवदत्ता, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कालिदासाची यक्षसृष्टी, चारुदत्त आणि शूद्रकृत मृच्छकटिक, त्रिवेणी हे अनुवादही मराठी-संस्कृतच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. प्रा.शेवाळकरांच्या ध्वनिफिती दर्दी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. अत्यंत ओघवती भाषा या ज्ञानतपस्वींकडे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर भुरळ पाडली. महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चित्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधीसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग भाग १ आणि २, अमृतसरिताः संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह, या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत. राम शेवाळकर यांचे ३ मे २००९ रोजी निधन झाले.