विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे या ब्लॉग वरती आपणास भारत देशातील महान व्यक्तींची माहिती उपलब्ध होणार आहे. देशासाठी लढणारे क्रांतिकारक जवान, सैनिक, खेळाडू, समाजसेवक, शिक्षण तज्ञ, वैज्ञानिक , लेखक, राजकारण, अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण महान व्यक्तींची ओळख कार्य , याची माहिती उपलब्ध होणार आहे.WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

सत्यशोधक भाई माधवराव बागल जन्मदिन*


*सत्यशोधक भाई माधवराव बागल जन्मदिन


जन्म - २८ मे १८९५ (कोल्हापूर)

स्मृती - ६ मार्च १९८६


सत्यशोधक भाई माधवराव बागल यांना प्रथम त्रिवार अभिवादन.


भारतीय इतिहासात करवीरनगरी कोल्हापूर या शहराने वेळोवेळी प्रत्येक क्षेत्रातील अनेक शिल्पकार नि शिलेदार जन्माला घातलेले आहेत. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानात २८ मे १८९६ ला जन्माला आलेले व महाराजांच्या निस्सीम प्रेमाने बहरलेले भाई माधवराव बागल हे असेच एक अजबगजब रसायन. 


चित्रकार, लेखक, स्वातंत्र्य चळवळ सेनानी, राजकारणी, सामाजिक सुधारणावादी, सत्यशोधक, गांधीवादी, फर्डा वक्ता, पत्रकार, शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता, मजूर चळवळीचा कार्यकर्ता, अस्पृश्यता निवारण कार्यकर्ता, मिश्रविवाह समर्थक, समाजवादी असे नाना पैलू असलेल्या महाराष्ट्राच्या या बहुआयामी महाविभूतीने केवळ गांधीजींच्या सल्ल्याने स्वत:मधील चित्रकार एका झटक्यात स्वत:तून बाजूला सारला. जे.जे. स्कूल्स ऑफ आर्ट्स या अत्यंत प्रतिष्ठीत अशा शिक्षणसंस्थेतून चित्रकलेचे शिक्षण घेतलेल्या माधवरावांना महात्मा गांधींनी १९२६ मध्ये कोल्हापूरला “अशी चित्रे काढा की जनसेवा घडेल” अशी प्रेरणा देताच या स्वातंत्र्यसेनान्याने क्षणार्धात हातातील कूंचला बाजूला सारून अख्खे जीवन लेखणीला समर्पीत केले.


महात्मा ज्योतीराव फुल्यांची सत्यशोधक चळवळ अत्यंत जोमाने पुढे नेताना ‘सत्यशोधकांनी समाजवादी व्हावे’ अशाप्रकारची मांडणी करून आंबेडकर-नेहरू यांना अपेक्षीत समाजवादी सुदृढ भारत घडविण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. १९३१ मधील त्यांच्या भाषणातील ‘महात्मा गांधी हे खरे सत्यशोधक आहेत’ हे त्यांचे वाक्य तत्कालीन महाराष्टीय समाजकारणाची कुस बदलविणारे ठरले. 


दलितांचे सामाजिक उन्नतीकरण व अस्पृश्यता निर्मुलन ही त्यांच्या सामाजिक कार्याची प्रमुख वैशिष्टे होय. १९३२ मध्ये जगदंबा मंदीर व मारुती मंदीरातील दलितांच्या प्रवेशाचा लढा त्यांनी मोठ्या निकराने लढला. त्यावेळेस त्यांना सामाजिक क्रांतीच्या प्रयत्नाकरिता राजद्रोहाची नोटीस बजावण्यात आली. कोल्हापूर संस्थानामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने १९३९ मध्ये त्यांनी स्थापन केलेली प्रजापरिषद त्यांच्या राजकीय जीवनातील एक मोठी उपलब्धी होय. या चळवळीमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. 


१९३८ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेवून काढलेल्या प्रचंड मोठ्या मोर्चामुळे त्यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वसामान्य जनतेला सरकार विरुद्ध संघर्ष करण्याची माधवरावांच्या विचारांतून प्रेरणा मिळू नये याकरिता त्यांच्या पायात लोखंडी बेड्या घालुन त्यांची कोल्हापूरच्या हमरस्त्यावरुन धींड काढल्या जात असे.


गांधीजींच्या विचारांनी प्रेरीत होवून त्यांनी १९४२ च्या भारत छोडो या लढ्यात करवीरनरेश छत्रपती शाहूंनी ईंग्रजांविरूद्ध लढा पुकारावा याकरिता प्रयत्न केलेत. ३० जानेवारी १९४८ ला झालेल्या त्यांच्या प्रेरणास्त्रोत म्हणजेच महात्मा गांधींच्या नृशंस हत्येमूळे ते प्रचंड उद्वीग्न झालेत. गांधी हत्येचा रोष म्हणून कोल्हापुर शहरात संघसमर्थक व हिंदूमहासभा समर्थकांची घरे व प्रतिष्ठानांची जनता जाळपोळ करित असताना त्यांनी कोल्हापुरच्या रस्त्यांवर फिरून संघ व हिंदुमहासभा अनुयायांना व त्यांच्या संपत्तीला सरंक्षण देण्याचा मोठेपणा दाखविला. त्यांनी चालविलेले हंटर, अखंड भारत, आघाडी, धडाडी हे वृत्तपत्रे तत्कालीन ईंग्रज सरकारने प्रतिबंधीत केलेत. त्यांच्या मर्मभेदी वकृत्त्व शैलीमूळे त्यांच्या भाषणावर सुद्धा सरकारला बंदी आणावी लागली.


भारतीय स्वतंत्रता लढ्यात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. १९४० ते १९४७ या कालावधीत त्यांचा गांधी, नेहरू, पटेल यांचेसोबत अगदी नजीकचा संबंध आला. १९३० मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या माधवरावांनी पुढे कॉंग्रेसच्या शेतकरी-कामकरी ध्येयधोरणा सोबत मतैक्य नसल्याने स्वातंत्र्यप्राप्ती नंतर क्रांतीसिंह नाना पाटील, केशवराव जेधे, शंकरराव मोरे या मातब्बरांसोबत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. छत्रपती शाहू महाराजांचे सहकारी भाष्करराव जाधवांसोबत माधवरावांनी कोल्हापूरच्या परिसरात कृषी सहकारी सोसायट्यांची स्थापना करुन शेतकऱ्यांना पतपुरवठा करणेकरिता महत्त्वाचे कार्य केले.


संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा भाई माधवराव बागलांनी हिरीरीने सहभाग घेतला. बेळगाव सत्याग्रहामुळे त्यांना सहा महीने तुरुंगवास भोगावा लागला. कूंचला, लेखणी, कूदळ, फावडे असा माधवरावांच्या जीवनाचा प्रवास होता. 


कला व क्रांती या दोन्ही क्षेत्रात सहज व समर्थपणे संचार करणाऱ्या या विभुतीच्या व्यक्तीमत्त्वावर राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ.आंबेडकर या विचारवादळांची छाप होती. त्यांनी ९ डिसेंबर १९५० ला कोल्हापूर नगरीत डॉ.आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा उभारला. गांधीजींच्या प्रेरणेतुन समाजकार्याकरिता बाजुला सारलेला कूंचला आंबेडकरांप्रती असलेल्या निष्ठेतून त्यांनी परत हातात घेवून हा पुतळा बाबासाहेबांच्या हयातीतच  स्वतः साकारला हे विशेष.


५० ते ५५ विवीध साहित्यकृती निर्माण करणार्‍या भाई माधवराव बागलांच्या लेखणीतून ज्योतीराव फुले यांचे सत्यशोधकी विचार कागदावर सहजरित्या उतरुन सर्वसामान्य जनतेच्या काळजापर्यंत भिडत असत. समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, बुवाबाजी, अस्पृश्यता, सनातनी दहशतवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विखारी वृत्ती, अशा अनेक विषयांवर त्यांची लेखणी धारदार करवतीसमान चालत असताना त्यांनी कुणाचीही भीड राखली नाही. त्यांनी अनेकदा स्वजातीय मराठा व्यक्तींना सुद्धा त्यांच्या लेखणीतुन आडव्या हाताने घेतले हे त्यांच्या पुर्वग्रहरहित लिखाणाचे सौंदर्य होय. 


धार्मिक सनातन्यांविरुद्ध त्यांची चाललेली लेखणी तत्कालीन धर्ममार्तंडांना मोठी अडचणीची ठरलेली असायची. कोल्हापुरातील महाद्वार रोडवर आर.एस.एस. च्या एका स्वयंसेवकाने त्यांचेवर एकदा अशाच एका लिखाणामुळे जिवघेणा हल्ला केलेला होता ही बाब महाराष्ट्र सरकारने प्रकाशीत केलेल्या त्यांचेवरील एका सन्मानग्रंथात नोंदविलेली आहे. 


त्यांच्या बुद्धीप्रामाण्यवादी विचारांमुळे जनमानसांत मोठी जागरुकता निर्माण होत असल्याच्या न्यूनगंडातुन कोल्हापुरातील सनातन्यांनी त्यांची जीवंतपणी प्रेतयात्रा काढल्याचे दुष्कृत्य या महाराष्ट्राने बघितलेले आहे. १९६९ मध्ये मनुस्मृतीवर त्यांनी ‘गोळवलकरी राज्य आले तर’ या पुस्तकातुन प्रचंड वैचारिक लत्ताप्रहार केलेला आहे. सद्यस्थितीत माजलेली असहिष्णुता व व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी त्यांनी आजपासुन ५० वर्षापुर्वी लिहिलेल्या या पुस्तकात नोंदवुन ठेवण्याचा दुरदृष्टिकोन बाळगला होता.


दिर्घ आयुष्य जगलेल्या या उत्तुंग उंचीच्या समाज सुधारकाने स्वतःचे संपुर्ण आयुष्य लोककल्याणकारी आंदोलनांच्या यज्ञात झोकून देताना एकदा पत्रके छापण्याकरिता पत्नीच्या अंगावरील मंगळसुत्र विकण्यासही मागेपुढे बघितले नाही. मात्र आयुष्याच्या अंतिम कालखंडात या महामानवाला आर्थिक विवंचना सहन करावी लागली हा दैवदुर्विलास म्हणावा की आमचा कृतघ्नपणा. 


अखेरच्या क्षणापर्यंत सामाजिक उन्नतीच्या ध्येया करिता धगधगत असलेले हे गांधीवादी सत्यशोधकी यज्ञकुंड ६ मार्च १९८६ ला कायमचे विझले. महाराष्ट्र शासनाने त्यांचे स्मृतीस्मरणार्थ माधवरावजी बागल विद्यापीठ, कोल्हापुर स्थापन करुन त्यांच्या विचारांना मानवंदना दिली. 


१९९८ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचेवर 'भाई माधवराव बागल-निवडक लेखसंग्रह' हा ग्रंथ प्रकाशित करुन त्यांचा आयुष्यपट उघडण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केलेला आहे.


महाराष्ट्राच्या अशा या उपेक्षित कर्मयोग्यास सलाम !

क्रांतिकारक मंगल पांडे


*क्रांतिकारक मंगल पांडे *

मंगल पांडे यांचा

जन्म - १९ जुलै १८२७ रोजी  ,उत्तर प्रदेश मध्ये झाला तर

स्मृतीदिन आहे . ८ एप्रिल १८५७


मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्ररदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते.


मंगल पांडे यांनी १८४९ साली, ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४ व्या बी.एन.आय. तुकडीच्या ५ व्या कंपनीत काम करत होते.


कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार) हून गोर्‍या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.


१९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. २९ मार्च १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. 

हे पहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पहाताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले.


 काही वेळानंतर थकलेले मंगल पांडे धरणीवर कोसळले आणि त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना पकडू शकले. आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला. 

 पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.८ एप्रिल १८५७ रोजी क्रांतिकारी मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.


मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी निःशस्त्र करून खालसा केल्या. याचा परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी  शिपायांनी आपणहून गुलामीचे चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले.


हा १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा प्रारंभ मानला जातो. 

*स्मारके* :

भारत सरकारने ५ ऑक्टोबर १९८४ रोजी पांडेंची प्रतिमा असलेली टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला. पांडे यांनी ज्या ठिकाणी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ला केला आणि नंतर पांडे यांना फाशी देण्यात आली त्या जागेवर शहीद मंगल पांडे महाउद्यान नावाच्या एका पार्कची उभारणी बराकपूर येथे करण्यात आली आहे.


*चित्रपट* :

आमीर खानचा 'मंगल पांडे : द राइजिंग' हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला. केतन मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात अमीर खान, राणी मुखर्जी या कलाकारांनी मुख्य पात्रांची भूमिका पार पाडली.


.

क्रांतिकारक रास बिहारी बोस

आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले क्रांतिकारक नेते रास बिहारी बोस यांचा जन्म २५ मे १८८६ रोजी बंगाल मधील वर्धमान जिल्ह्यातील सुबालदह गावी झाला.


ब्रिटिश सरकार विरोधात गदर षड्यंत्र रचण्यापासून ते देशातील ब्रिटिश सरकारच्या विरोधात चळवळींचे नेतृत्व करण्याची कामगिरी रास बिहारी बोस यांनी बजावली. रास बिहारी बोस यांनी परदेशात राहूनही देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते आजन्म प्रयत्नरत राहिले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चार्ल्स हार्डींगवर बॉम्ब हल्ला करण्याची योजना आखणे. गदर कटानंतर जपानला पलायन करून तेथे इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात रास बिहारी बोस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 


रास बिहारी बोस यांचे सुरुवातीचे शिक्षण चंदननगर मध्ये झाले. बालपणापासूनच रास बिहारी बोस देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत. तसेच क्रांतिकारक चळवळींमध्ये त्यांना खूप आवड होती. सुरुवातीच्या काळात रास बिहारी बोस यांनी डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत मुख्य लिपिक म्हणून काम केले. त्याचदरम्यान क्रांतिकारक जतीन मुखर्जींच्या नेतृत्वाखालील युगांतर नामक क्रांतिकारक संघटनेचे अमरेंद्र चॅटर्जी यांच्याशी रास बिहारी बोस यांची ओळख झाली. अशाप्रकारे ते बंगालमधील क्रांतिकारकांशी जोडले गेले. त्यानंतर ते अरविंद घोष यांचे राजकीय शिष्य राहिलेले जतींद्रनाथ बॅनर्जी यांच्या संपर्कात आले. त्यानंतर रास बिहारी बोस हे संयुक्त प्रांत (सध्याचा उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील प्रमुख आर्य समाजी क्रांतिकारकांच्या जवळ आले. 


१२ डिसेंबर १९११ रोजी भरविण्यात आलेल्या दिल्ली दरबारानंतर जेव्हा तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगची दिल्लीतून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी शोभे यात्रेदरम्यान व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकण्याची योजना बनविण्यात रास बिहारी बोस यांची प्रमुख भूमिका होती. त्यानुसार अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंतकुमार विश्वासने त्यांच्यावर बॉम्ब फेकला, परंतु बसंतकुमार यांचा निशाणा चुकला. या घटनेनंतर ब्रिटिश पोलीस रास बिहारी बोस यांच्यामागे लागले. ब्रिटिशांची नजर चुकवून रास बिहारी बोस यांनी रातोरात रेल्वे पकडून डेहराडून गाठले. विशेष म्हणजे कोणालाही शंका येऊ नये याची रास बिहारी बोस यांनी काळजी घेतली. त्यासाठी त्यांनी डेहराडूनमध्ये नागरिकांची सभा बोलावली. सभेत त्यांनी व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगवरील हल्ल्यावर टीका केली. 


१९१३ मधील बंगालमध्ये आलेल्या पुराच्या मदतकार्या दरम्यान रास बिहारी बोस यांची भेट जतिन मुखर्जींशी झाली. त्यांनी रास बिहारी बोस यांच्यात नवा जोश भरण्याचे काम केले. यानंतर दुप्पट उत्साहाने रास बिहारी बोस यांनी क्रांतिकारक चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिले. युरोपात युद्ध सुरू असल्याने सैनिक मोठ्या संख्येने देशाबाहेर गेले आहेत. तेव्हा देशात असलेल्या थोड्याफार सैन्याला आपण सहज पराभूत करू, असे युगांतरच्या अनेक नेत्यांना वाटले, पण त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी होऊन ब्रिटिशांनी अनेक क्रांतिकारकांना अटक केली. मात्र, रास बिहारी बोस ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. 


पुढे १९१५ मध्ये जपानमधील शांघाय शहरात पी एन टागोर या नावाने राहून रास बिहारी बोस यांनी विदेशी बनावटीच्या हत्याऱ्याचा पुरवठा करत भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम केले. अशाप्रकारे रास बिहारी बोस यांनी अनेक वर्षे भारतापासून दूर राहत देशसेवा केली. जपानमध्येही आपल्या क्रांतिकारक मित्रांसोबत रास बिहारी बोस देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नरत राहिले. 


त्यांनी जपानमधील इंग्रजी जपानमध्ये अध्यापनासह लेखक आणि पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी न्यू एशिया नामक वृत्तपत्र सुरू केले. एवढेच नाही तर त्यांनी जपानी भाषा अवगत करून १६ पुस्तकं लिहिली. विशेष म्हणजे रामायणाचे जपानी भाषेत अनुवाद करण्याचे कामही त्यांनी केले. जपानमधील टोकियो मध्ये रास बिहारी बोस यांनी हॉटेल सुरू करून तेथील भारतीयांना संघटित करण्याचे काम केले. जपान मध्येही ब्रिटिश सरकारने रास बिहारी बोस यांची पाठ सोडली नाही. 


ब्रिटिशांनी जपानकडे रास बिहारी बोस यांना ताब्यात देण्याविषयी मागणी केली. त्यामुळेच रास बिहारी बोस यांना जपानमध्ये सतत नावे आणि घरं बदलून रहावे लागत होते. १९१६ मध्ये प्रसिद्ध पॅन एशियाई समर्थक सोमा आईजो आणि सोमा कोत्सुको यांच्या सुपुत्री सोबत रास बिहारी बोस यांचा विवाह झाला. त्यांनतर १९२३ मध्ये रास बिहारी बोस यांनी जपानचे नागरिकत्व स्वीकारले. 


जपान मधील अधिकार्यांविना भारताच्या राष्ट्रवादी भूमिकेत सामील करून घेत देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात जपानी अधिकार्यांतच सक्रिय पाठिंबा मिळवून देण्यात रास बिहारी बोस यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. 


२८ मार्च १९४२ रोजी टोकियो येथे रास बिहारी बोस यांनी संमेलनाचे आयोजन केले. या संमेलनात त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. २२ जून १९४२ रोजी रास बिहारी बोस यांनी बँकॉकमध्ये लीगच्या दुसऱ्या संमेलनाचे आयोजन केले. ज्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांना लीगमध्ये सामावून घेत लीगच्या अध्यक्षस्थानी आमंत्रित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

भारताला ब्रिटिश राजमधून मुक्ती मिळविण्यात रास बिहारी बोस आजन्म कार्यरत राहिले. जपान सरकारने रास बिहारी बोस यांचा ऑर्डर ऑफ द राइजिंग सनने सन्मानित केले होते. रास बिहारी बोस यांचे २१ जानेवारी १९४५ रोजी निधन झाले.

कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन


कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला.


आप्पासाहेब हे देशभरात मुख्यत: रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. ते स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. त्यांनी त्यांना तुरुंगात भंगीकाम करण्यास मिळावे म्हणून केलेला सत्याग्रह गाजला. कारण त्यांच्या समर्थनार्थ गांधीजींनीही उपोषण केले. एवढा परस्पर विश्वास त्या दोघांत होता. महारबंधूंनी मेलेल्या पशूची कातडी सोडवणे बंद केले तेव्हा त्यांनी मृतपशूची कातडी, खतासाठी मांस आणि हाडे मिळवण्याच्या दृष्टीने अनेक चर्मालये काढली. तेथे भाई सुखी, बाबा फारक, बाळूदादा पानवलकर, शामराव जोशी, बांदेकर हे त्यांचे पहिल्यापासूनचे सोबती व अनेक ब्राह्मण सहकारीसुद्धा काम करत. ते सगळे स्वातंत्र्यसैनिक होते. दलितमित्र रमाकांत आर्ते यांनीही खूप काम केले. 


आप्पांनी भंगी कष्टमुक्तीसाठी चराचे संडास, गोपुरी संडास, सोपा संडास असे अनेक संडास लोकप्रिय केले. मानवी विष्ठेचा खतासाठी उपयोग करताना त्यांनी शौचघरे शास्त्रीय पद्धतीने बांधली. त्यांनी ३ फूट x ३ फूट x ३ फूट आकाराच्या दोन टाक्या‍ बांधल्या. या टाक्याी एकमेकांना लागून होत्या. टाक्यांच्या वरच्या बाजूस मधोमध शौचविधी करण्यास दीड फूट लांब व नऊ इंच रुंद अशी पोकळ जागा ठेवण्यात आली. शौचविधी झाल्यानंतर त्यावर माती टाकण्यात येई. असे केल्यानंतर सहा महिन्यांत त्यातून सेंद्रिय खत तयार होई. एक टाकी भरली, की दुसऱ्या टाकीचा उपयोग केला जाई. अप्पासाहेबांनी त्याला 'गोपुरी शौचघर' असे नाव दिले. 


आप्पांनी त्याकाळात कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लँट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोगही केले. त्यावर पुस्तके लिहिली. अप्पासाहेब पटवर्धन हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे यांनी या आश्रमाला भेट दिली आहे. अप्पासाहेबांचे ५० वर्षा पूर्वीचे विचार आज जनतेसाठी प्रेरणादायी आहेत. 


आप्पासाहेब पटवर्धन यांचे १० मार्च १९७१ रोजी निधन झाले.

श्रीधर महादेव जोशी

  


 श्रीधर महादेव जोशी 

  टोपणनाव: एसेम

*जन्म: १२ नोव्हेंबर १९०४*

*मृत्यू: १ एप्रिल १९८९*



श्रीधर महादेव जोशी, अर्थात एस.एम. जोशी,  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील नि:स्वार्थीपणे अन्‌ अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये असून मवाळ वृत्तीचे एक नेते होते.                   

एम. जोशींचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीजवळील गोळप होय. एकत्रित असलेले मोठे कुटुंब व एकटे वडील कमवते अशा स्थितीत जेमतेम भागणाऱ्या घरात त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली आणि पुढे ही स्थिती आणखीनच बिघडत गेली. १९१५ साली वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची परवड झाली. अशाही परिस्थितीत शिक्षणाविषयीची त्यांची ओढ कायम राहिली. सवलती, शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी अध्ययन सुरूच ठेवले.

एसेएम जोशींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वार्थाकडे दुर्लक्ष करून, देशार्थासाठी कार्यरत राहणे एसएम जोशींनी चालूच ठेवले. १९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार झाले आणि १९६७ साली ते २ऱ्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून गेले..

घरात दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असताना आणि स्वतःचेच दु:ख डोंगराएवढे असतानाही देशहिताच्या गोष्टी करण्याची इच्छा त्यांना लहानपणापासूनच होती. जो दुबळा आहे त्याच्या बाजूने आपल्या तत्त्वांची ताकद उभा करणारा हा लढवय्या अगदी लहानपणापासून लोकहितदक्ष असे. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी शिकविणाऱ्या मास्तरांनी चेहऱ्यावर देवीचे व्रण असणाऱ्या एका विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले; तेव्हाचा प्रसंग त्यांच्या इतरांसाठी लढण्याच्या आपल्या न्यायी वृत्तीचे दर्शन घडवितो. त्या मास्तरांना त्यांच्या तासाला छान दिसणाऱ्या मुलांनीच पुढे बसावे असे वाटायचे. म्हणून मास्तरांनी ‘त्या’ विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले. एस. एम. यांनी याला विरोध केला. समर्पक कारण देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्याला हट्टाने पुढेच बसवायला लावले. ज्यांना समाज चुकीच्या कारणासाठी नाकारतो, त्यांना स्वीकारण्याची मानवतावादी दृष्टी एस.एम. यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भागच होती – हे सांगणारा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपापल्या परीने आणि मार्गाने प्रत्येक जण लढत होता. जहाल – मवाळांच्या अखंड प्रयत्नातून आशेचा किरण सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत होता. हे प्रयत्न, राष्ट्रभक्तीचे वातावरण या सर्वांविषयी एस.एम. यांना विलक्षण ओढ होती. चिरोल खटला लढवून परत आलेल्या लोकमान्य टिळकांची मिरवणूक पाहण्यासाठी गेल्यामुळे त्यांना छड्या खाव्या लागल्या होत्या. हा अनुभव असतानाही १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींची मिरवणूक काढली गेली, त्यातही ते सामील झाले. याही वेळी त्यांना छड्या खाव्या लागल्या. पण पर्वताएवढ्या निष्ठेसमोर ती शारीरिक शिक्षा त्यांच्यासाठी नगण्य होती. पुणे येथे विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून तिच्या मार्फत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, मुंबईत यूथ लीग परिषदेचे आयोजन अशी कामे करत असताना त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.

जात-पात व धर्मभेदापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे हा विचार घेऊन एस.एम. यांनी सनातन्यांचे विचार नाकारले. १९२९ मध्ये तत्कालीन अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून केलेल्या पर्वती येथील (पुणे) सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला. या सत्याग्रहाला विरोध करायला आलेले सनातनी हजारोंच्या संख्येत होते. पर्वती सत्याग्रहानंतर सनातन्यांनी सत्याग्रहाला विरोध म्हणून सभाही घेतली. त्या प्रचंड सभेचा रोष एस. एम. यांना स्वीकारावा लागला. पण सत्य आणि न्याय्य बाजूसाठी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती.

सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. या तुरुंगवासाच्या काळात ते ज्येष्ठ नेत्यांच्या सान्निध्यात आले. येथेच त्यांना मार्क्सवाद व समाजवाद या संकल्पनांचा सखोल परिचय झाला. यातूनच पुढे ते काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या स्थापनेत व कार्यात पुढाकारासह सहभागी झाले. भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात समाजवादी तत्त्वज्ञानाचा निष्ठेने प्रसार करण्याचा यशस्वी प्रयत्न एस.एम. यांनी यथाशक्ति केला. समाजवादी विचारसरणीचे एक प्रमुख अग्रणी, एक निष्ठावंत आधारस्तंभ म्हणूनच त्यांना ओळखले जात असे.    देशाला स्वातंत्र्य आणि देशबांधवांना अधिकाराचे जगणे मिळावे यासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष केले. १९ ऑगस्ट, १९३९ रोजी त्यांचे लग्न झाले. पण देशाच्या संसारात गुंतलेले हात घरच्या संसाराला हातभार लावायला मिळणे कठीण होते. यानंतरचे एस.एम. यांचे आयुष्य म्हणजे वाऱ्यासारखे वेगवान होते. युद्धविरोधी चळवळीसाठी तुरुंगवास, छोडो भारत चळवळ, राष्ट्रसेवा दल अशा अनेक कार्यातल्या त्यांच्या सहभागाने प्रापंचिक कर्तव्यांना मर्यादा पडल्या.

१९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. आधी महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत भाग घेतल्याबद्दल १९३० साली एक वर्षाचा आणि नंतर 'राॅय दिना'च्या दिवशी केलेल्या भाषणाबद्दल दोन वर्षांचा असा एकूण सुमारे ३ वर्षे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. साबरमती, नाशिक व येरवडा येथील तुरुंगांमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. या काळात त्यांना समृद्ध करणारा साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. या संघटनेच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रवादाचे संस्कार देणे, त्यासाठी शिबिरे-संमेलने-मेळावे भरवणे, कलापथके स्थापन करून त्याद्वारे अस्पृश्यताविरोधी प्रचार, स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा पाठपुरावा अशी अनेक रचनात्मक कामे त्यांनी केली. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, पु.ल.देशपांडे, निळू फुले, राम नगरकर, स्मिता पाटील इत्यादी दिग्गज कलावंत त्या-त्या काळात काम करत होते. यामागे प्रमुख प्रेरणा एस.एम. जोशी यांचीच होती. स्वातंत्र्य आंदोलनात काही काळ त्यांनी भूमिगत राहूनही कार्य केले.

एसएम जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आणि त्यानिमित्त झालेल्या प्रत्येक सार्वजनिक सभेत एसएम यांची हजेरी असे.

📙 *प्रकाशित साहित्य*

नेताजींचे सीमोल्लंघन

मी एस् एम् (आत्मचरित्र)

📚 *एसएम जोशींवरील पुस्तके*

लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ (डाॅ. वासंती रासम आणि डाॅ. करिअप्पा खापरे)

🗽 *स्मारके*

एस. एम. जोशी हिंदी शाळा, पुणे.

एस. एम. जोशी काॅलेज, हडपसर (पुणे)

एस. एम. जोशी सभागृह, पुणे

एस. एम. जोशी अध्यापक विद्यालय, नाशिक


श्रीपाद अमृत डांगे



*श्रीपाद अमृत डांगे*


श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म  १० ऑक्टोबर १८९९ रोजी नाशिक येथे झाला .

श्रीपाद अमृत डांगे हे मुंबई , महाराष्ट्राचे रहिवासी होते आणि त्यांनी भारतात समाजवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी 'द सोशलिस्ट' नावाचे वृत्तपत्र प्रकाशित करण्यास सुरुवात केली .


त्यांनी कामगारांमध्ये चैतन्य जागृत केले आणि त्यांना त्यांच्या हितासाठी लढण्यासाठी प्रोत्साहित केले.


श्रीपाद अमृत डांगे हे दुसऱ्या आणि चौथ्या लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.


कानपूर कट प्रकरणात ज्या 4 समाजवादी नेत्यांवर खटला चालवण्यात आला त्यात डांगे यांचाही समावेश होता. या अंतर्गत त्याला 4 वर्षांची शिक्षा झाली.


त्यांनी 'गांधी आणि लेनिन' नावाचे पुस्तकही लिहिले, ज्यामध्ये या दोन नेत्यांचे आणि त्यांच्या विचारांचे तुलनात्मक विश्लेषण केले आहे.

भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी श्रीपाद अमृत डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात. 


श्रीपाद अमृत डांगे मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असता आर.बी. लाटवाला या गिरणीमालकाशी त्यांचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकारिता त्यानी विठ्ठलभाई पटेला मार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांग्यांचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. १९२४ मध्ये डांगे तुरुंगात गेले व १९२७ मध्ये त्यांची सुटका झाली. १९२६-२७ चा कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला. डांग्यांनी गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यास प्रारंभ केला. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी 'क्रांति' हे मराठी साप्ताहिक काढले. थोड्याच अवधीत ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. 


त्यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले. उच्च शिक्षणाकरिता ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात आले. विद्यार्थिदशेत त्यांनी चळवळीत भाग घेतला. महाविद्यालयात बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला. गांधींच्या असहकाराच्या चळवळीत सहभागी होण्याकरिता बी.ए.ला असताना महाविद्यालयीन शिक्षणास  रामराम ठोकला.  झाला, म्हणून ते राष्ट्रवादाकडून साम्यवादाकडे वळले आणि गांधी व्हर्सस लेनिन हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकाने मानवेंद्रनाथ रॉय यांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले. 


साम्यवादी विचारांचा प्रचारार्थ त्यांनी सोशॅलिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र १९२२ मध्ये सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशॅलिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. कानपूर-बोल्शेव्हिक कटात भाग घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक होईपर्यंत हे वृत्तपत्र चालू होते. या वृत्तपत्रामुळे मानवेंद्रनाथ रॉय यांनी चौथ्या कम्युनिस्ट इंटरनॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनास डांगे यांना चार्ल्स ॲश्ले यांच्यामार्फत नियंत्रण पाठविले; पण डांगे मॉस्कोला १९४६ पर्यंत जाऊ शकले नाहीत. त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर १९३५ मध्ये ते सुटले. या वेळी ब्रिटिश सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती. तथापि डांगे त्या पक्षाचा प्रसार व प्रचार गुप्त रीत्या करीत असत. 


१९३९ मध्ये त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणीकामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. १९४३ मध्ये ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून आले आणि १९५७ च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले. 




खासगी जीवनात स्पष्टवक्ता, विश्वासू मित्र म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या विधवा उषाताईंशी १९२८ मध्ये विवाह केला. त्यांचा अमृतमहोत्सव १९७४ मध्ये साजरा झाला. या प्रसंगी सोव्हिएट रशियाने आपले सर्वोच्च ‘लेनिन पदक’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. या प्रसंगी त्यांच्याविषयी एक स्मरणिका व गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे. 


श्रीपाद अमृत डांगे यांच्या बद्दल अशी गोष्ट सांगितली जाते की डांगे यांच्या नेतृत्त्वातून आणखी दोन गोष्टी जन्माला आल्या. महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली आणि फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारक निर्माण झाले. त्यात शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीची प्रतिमा आली. 


महाराष्ट्र राज्य निमिर्तीसाठी दिल्लीतील विद्वानांनी १ एप्रिल ही तारीख ठरवली होती. यशवंतराव चव्हाणांनी हा बेत कॉ.डांगे यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, 'अहो, शहाण्यांना मूर्ख बनवण्याचा जागतिक दिन तो, आणि त्या दिवशी तुम्ही नव्या राज्याची गुढी उभारणार? ते जमायचं नाही. हा लढा मुख्यत्वे मुंबईच्या कामगार वर्गात लढलेला आहे. तेव्हा मे दिन हाच महाराष्ट्र दिन होईल. नेहरूंना समजावण्याची जबाबदारी माझी.' कॉ.डांगे नेहरूंना दिल्लीत जाऊन भेटले. 'आम्हाला एप्रिल फूल करताय का?' असा प्रश्न त्यांनी केला. नेहरूही हसले आणि त्यांनी १ मे ही तारीख मान्य केली. आणि १ मे महाराष्ट्र दिन झाला. 


श्रीपाद अमृत डांगे यांचे २२ मे १९९१ रोजी निधन झाले.

राजाराम मोहन रॉय



*राजाराम मोहन रॉय*

आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाकजाचे संस्थापक. राममोहन रॉय यांचा  जन्म बंगाल मधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला. 

नवाबाच्या दरबाराने ‘राय’ तर राजा" हि पदवी मुगल सम्राट अकबर (द्वितीय) याने  सन्मानदर्शक पदवी त्यांना बहाल  केली . एवढे मोठे कार्य त्यांनी पुढे केले .

त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर केले. त्यांना "राजा" हि पदवी मुगल सम्राट अकबर (द्वितीय) याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते.


राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात. त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका" नावाचे वृत्तपत्र सुरु केले. ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले. त्यांनी मूर्तीपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे, असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. 


भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था व शिक्षण व्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली. त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी "संवाद कैमुदी" हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी "मिरात उल अखबार" हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.


राजा राममोहन रॉय यांना नवनिर्मितीचा काळ आणि आधुनिक भारताचे वडील मानले जाते. भारतीय सामाजिक आणि धार्मिक धर्मातच त्यांचे विशिष्ट क्षेत्र आहे. सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय होय. राजा राम मोहन रॉय यांना परंपरांनी जखडलेला भारत आणि सर्व परंपरा झुगारून देणारा भारत यांच्या मधील पूल असं म्हटलं जातं. त्यांचे जीवन कार्य इतके प्रचंड आणि असाधारण आहे.

🙏🙏🙏

क्रांतिकारक बिपिनचंद्र पाल



*क्रांतिकारक बिपिनचंद्र पाल

 बंगालमधील एकश्रेष्ठ देशभक्त ज्याच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो यांनी म्हटले आहे कि, बिपीन चंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वोत्तम विचारवंत होते. बिपिनचंद्राचा जन्म ७ नोव्हेंबर १८५८ रोजी पाईल (सिल्हेट जिल्हा) या गावी झाला. सध्या हा प्रदेश बांगला देशात अंतर्भूत होतो. त्यांचे वडील रामचंद्र पाल हे जमीनदार व वकील होते. हळूहळू ते मुन्सफच्या जागेपर्यंत चढले.  बिपिनचंद्रांची आई नारायणदेवी विशेष शिकलेल्या नव्हत्या; पण शिस्त व धार्मिक बाबी त्या कटाक्षाने पाळीत. 


बिपिनचंद्रांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यानंतर त्यांनी दोन मिशनरी व एका सरकारी माध्यमिक विद्यालयांतून इंग्रजी शिक्षण घेतले आणि कलकत्ता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली. पुढे ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयात दाखल झाले; पण दोन वेळा नापास झाल्यावर त्यांनी या औपचारिक शिक्षणास कायमचा रामराम ठोकला. या सुमारास ते ब्राह्मोसमाजाकडे आकृष्ट झाले. त्याची अधिकृत दीक्षा त्यांनी नंतर घेतली. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या वडिलांस फार दुःख झाले. बिपिनचंद्रांनीही अखेरीस आपला दुराग्रह सौम्य केला. 


बिपिन चंद्रांचे एकूण आयुष्य कष्टमय होते. विद्यार्थि दशेतच त्यांनी विपुल वाचन केले. ब्राह्मोसमाजाचे केशवचंद्र सेन यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली. याशिवाय पी.के. रॉय. 


आनंदमोहन बोस, द्वारकानाथ गांगुली वगैरे विद्वानांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी नृत्यकालीदेवी या ब्राह्मण विधवेशी पहिला विवाह केला आणि तिच्या मृत्यू नंतर पुढे दहा वर्षांनी ब्रिजमोहनदेवी या दुसऱ्या विधवेशी लग्न केले. 


सुरुवातीस त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कटक, सिल्हेट, बंगलोर, हबिबगंज इ. ठिकाणी काम केले. वृत्तपत्र व्यवसायाकडेही त्यांची ओढ होती. १८८० साली त्यांनी परिदर्शक हे बंगाली साप्ताहिक सुरू कले. पुढे बेंगॉल पब्लिक ओपिनियन चे ते साहाय्यक संपादकही झाले. लाहोरच्या ट्रिब्यून मध्ये साहाय्यक संपादक म्हणून ते १८८७ मध्ये रुजू झाले. कलकत्त्याच्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून काही काळ त्यांनी काम केले. ग्रंथालयाचे ते चिटणीसही होते. हे सर्व करीत असताना ते काँग्रेसच्या अधिवेशनांना हजर राहत. त्यांनी आसाममधील चहाच्या मळ्यातील मजुरांचा प्रश्न घसास लावला आणि मुख्य आयुक्त हेन्रीग कॉटन याला त्यात लक्ष घालणे भाग पडले. 


बिपिनचंद्र धर्मशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला गेले, पण ही शिष्यवृत्ती त्यांनी एक वर्षातच सोडली व इंग्लंड मध्ये ते राजकीय कार्य करू लागले. तेथून ते प्रचारमोहिमेतून अमेरिकेला गेले. १९०१ साली ते भारतात परतले. भारतात आल्या नंतर 'न्यू इंडिया' हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. बंगालच्या फाळणी नंतर लोकमान्य टिळक व लाला लाजपतराय यांच्याबरोबर स्वदेशीच्या चतुःसुत्रीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला. 


सारा बंगाल त्यांनी आपल्या व्याख्यानांनी जागृत केला. बहिष्कार व निःशस्त्र प्रतिकार यांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी मद्रासलाही यांवर भाषणे दिली. त्यांनी 'वंदेमातरम' हे दैनिक सुरू केले. त्यांनी अरविंद घोष यांना संपादक केले. यानंतर ते इंग्लंडला जाऊन राहिले. या काळात एक नवीन विचार त्यांनी प्रसृत केला आणि भारत स्वयंशासित वसाहत म्हणून ब्रिटिशांना सहकार्य देईल, हे तत्त्व मांडले. या तत्त्वास एम्पायर आयडिया हे नाव त्यांनी दिले. भारतात परत आल्यानंतर त्यांच्या एका लेखाबद्दल त्यांना एक महिन्याची शिक्षा झाली. 

राष्ट्रीय चळवळी” दरम्यान बिपिनचंद्र पाल यांनी आपल्या भाषणातून देशातील जनतेच्या मनात नविन चेतना संचारण्याचे महत्वपूर्ण काम केलं. शिवाय, देशातील सामान्य जनतेला जागरूक करण्याचे महत्वपूर्ण कामगिरी त्यांनी पार पाडली. बिपिनचंद्र पाल यांची अशी धारणा होती की, इंग्रज शासना विरुद्ध शांततेने चळवळी, मोर्चे काढून काहीच फरक पडणार नाही.  अश्या प्रकारचे कितीही आंदोलन केली तरी इंग्रजांच्या मानवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.


देशाला स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तर इंग्रज शासनावर जोरदार हल्ला करायला पाहिजे. बिपिनचंद्र पाल यांच्या याच विचारधारांमुळे त्यांना “स्वातंत्र्य चळवळीतील” क्रांतिकारक विचाराचे जनक म्हंटले

बिपिनचंद्र हे एक तत्त्वचिंतक होते. त्यांना देशाची सर्वांगीण तयारी झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको होते. त्यांची राष्ट्रीयत्वाची कल्पना धर्मभावनांशी निगडित होती. ते होमरूल लीगचे सभासद होते, तसेच काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. काँग्रेसचे जे शिष्टमंडळ संयुक्त संसद समितीपुढे साक्षीकरिता १९१९ मध्ये गेले, त्यांत ते होते. त्यांनी गांधीजींच्या असहाकार चळवळीला विरोध केला. तसेच चित्तरंजन दास आणि स्वराज्य पक्ष यांवर टीकेची झोड उठविली. 


मौलाना मुहंमद अली यांच्याशी जातीय प्रश्नासंबंधी त्यांचे मतभेद झाले आणि वाद निर्माण झाला. या विविध व्यक्तींशी त्यांच्या व्यक्तिनिष्ठ धोरणामुळे मतभेद झाल्यामुळे ते अखेर एकाकी पडले आणि टिळकांनंतरच्या गांधीयुगात त्यांचे नेतृत्व निष्प्रभ ठरले. ते १९२८ च्या सर्वपक्षीय परिषदेस उपस्थित होते; पण त्यांनी कोणतीच विशेष अशी कामगिरी पतकरली नाही व एकाकी, निःस्पृह कार्यकर्त्याची भूमिका स्वीकारली. 


बिपिन चंद्रांनी अनेक वृत्तपत्रे काढली. वंदेमातरम सारखी जहाल वृत्तपत्रे अतिशय लोकप्रिय झाली. या आणि इतर वृत्तपत्रांतून त्यांनी आपले विविध विषयांवरील विचार मांडले. यांशिवाय त्यांनी तत्कालीन थोर व्यक्तींची चरित्रे लिहिली. त्यात व्हिक्टोरिया राणी, केशवचंद्र सेन, रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, अरविंद घोष, आशुतोष मुखर्जी वगैरेंची चरित्रे अंतर्भूत होतात. त्यांनी मेमरीज ऑफ माय लाइफ अँड टाइम्स या शीर्षकाने आत्मचरित्र लिहिले. याशिवाय इंडियन नॅशनॅलिझम, द न्यू इकॉनॉमिक मेनेस टू इंडिया व ब्राह्मोसमाज अँड द बॅटल ऑफ स्वराज्य इन इंडिया ही त्यांची पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. पहाडी आवाजाचे एक प्रभावी वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. लाल (लाला लजपतराय), बाल (बाळ गंगाधर टिळक) व पाल या त्रयीने वंगभंग, स्वदेशी व बहिष्काराचे प्रचंड आंदोलन करून जनजागृती केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ते एक चिरप्रेरक पर्व आहे. 


क्रांतिकारी विचारांचे जनक’ म्हणून बिपिनचंद्र पाल यांचे नाव घेतले जाते. त राष्ट्रीय नेत्याबरोबर एक शूरवीर क्रांतिकारक असलेल्या पाल यांना अभिवादन 

🙏🙏🙏

पुरुषोत्तम केशव काकोडकर

 स्वातंत्र्यसेनानी 

पुरुषोत्तम केशव काकोडकर (18 मे 1913 - 2 मे 1998) हे गोव्यातील प्रख्यात राजकारणी आणि समाजसेवक होते. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात त्यांनी खासदार म्हणून काम पाहिले. त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले गेले. 1946 मध्ये राम मनोहर लोहिया यांनी गोवा येथे सुरू केलेल्या गोवा मुक्ती चळवळ तसेच सविनय कायदेभंग चळवळीतही त्यांनी भाग घेतला.


पोर्तुगीज वसाहती प्रशासनाने त्यांना हद्दपार केले व त्यांना नजरकैदेत ठेवले. 1956 मध्ये पोर्तुगालच्या अटकेतून सोडल्यानंतर काकोडकर पुन्हा भारतात परत आले. आपल्या कुटुंबासमवेत मुंबईत काही काळ घालवल्यानंतर ते गोव्यात आले आणि मारगाओ येथे आश्रम स्थापन केला. या आश्रमाचा उपयोग स्वातंत्र्य चळवळ करण्यासाठी केला गेला आणि बर्‍याच स्वातंत्र्य सैनिकांनी आश्रमात आश्रय घेतला होता. पोलिसांना लवकरच आश्रमाचा खरा हेतू कळला आणि त्यांनी तो बंद केला.


ते गोव्यातील सालाझार प्रशासनाविरूद्ध आवाज उठविणाऱ्यांपैकी एक होते. 1961 मध्ये त्यांनी पोर्तुगीज भारताच्या स्वायत्ततेसाठी पाठपुरावा केला परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत. गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काकोडकर हे त्यांचे निकटवर्तीय आणि सल्लागार अ‍ॅडव्होकेट रुई गोम्स परेरा यांच्या निवासस्थानी पंजिममध्ये स्थापन झालेल्या काँग्रेसच्या गोवा युनिटचे प्रमुख होते. गोम्स परेरा हे गोव्याचे सर्वात पहिले कायदेशीर सल्लागार वकील आणि एक चतुर राजकारणी म्हणून मानले जात असत. (एन. पट्टीहल यांनी दिलेली माहिती).


#राजकीय_कारकीर्द-


1971 ते 1977 पर्यंत त्यांनी गोवा, दमण आणि दीव या पूर्वीच्या केंद्रशासित प्रदेशातील पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेत खासदार म्हणून काम पाहिले. 1985 ते 1991 पर्यंत ते राज्यसभेचे नामित सदस्य होते. 1986-87 दरम्यान ते राज्यसभेच्या याचिका समितीचे सदस्य होते.


काकोडकर हे 1984-1996 दरम्यान गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांचे सुपुत्र म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ #अनिल_काकोडकर हे भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻


विष्णुशास्त्री चिपळूणकर

 

विष्णुशास्त्री चिपळूणकर

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म

२० मे १८५० (पुणे) रोजी झाला

विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे   महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालय मध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. 


बीए होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी १८७५ मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक २५ जानेवारी १८७४ रोजी सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले. 

महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी १८७२ ते १८७७ सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ते १८७९ सालांदरम्यान रत्नाागिरीतील शाळांमधून अध्यापनाचे काम केले. १८७४ साली चिपळूणकरांनी निबंधमाला हे मासिक प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी १८७८ साली महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. 


१८७५ साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून १८८० साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल शाळा स्थापली. १८८१ सालाच्या जानेवारीत त्यांनी 'केसरी' हे मराठी व 'मराठा' हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. 

चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. . 

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे १७ मार्च १८८२ रोजी निधन झाले. 

🙏🙏

नीलम संजीव रेड्डी



स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाणाऱ्या आदरणीय

*नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म 19 मे 1913 रोजी इल्लूर, जि. अनंतपूर, आंध्रप्रदेश येथे झाला .

          

नीलम संजीव रेड्डी यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात 3 पंतप्रधानांना - मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह आणि इंदिरा गांधी यांना शपथ दिली. वेगवान राजकीय घडमोडींदरम्यान त्यांनी राष्ट्रपती म्हणून अशा परिस्थितीचा सामना केला ज्याबाबत घटनेमध्ये स्पष्ट तरतूद नव्हती. पूर्वीपासून चालत आलेला एखादा पायंडाही नव्हता की ज्याचे अनुकरण करावे. पण परिस्थिती मात्र लगेच निर्णय घेण्याची होती. आणि अशा वेळी त्यांनी नि:पक्षपाती भूमिका घेऊन आदर्श कायम केला. म्हणून भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

 *शेतकरी कुटुंबात जन्म ते भारताचे राष्ट्रपती*

1 जून ही भारताचे सहावे राष्ट्रपती आणि आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या नीलम संजीव रेड्डी यांची पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील इल्लूर (जि. अनंतपूर) या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नीलम चिनप्पा रेड्डी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. संजीव रेड्डींचे सुरुवातीचे शिक्षण अड्यार येथील थिऑसॉफिकल शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले.


 *स्वातंत्र्यलढ्यात उडी*


शिकत असतानाच ते युवक काँग्रेसकडे आकर्षिले गेले. 1931 मध्ये त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत उडी घेतली. यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. मधल्या काळात त्यांनी मिळेल ती नोकरी केली. तथापि, कुठेही ते कायम नोकरीत रमले नाहीत. नंतरच्या काळात ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे सचिव झाले. तत्पूर्वी त्यांचा नागा रत्नम्मा यांच्याबरोबर विवाह झाला. त्यांना 2 मुले व 3 मुली अशी अपत्ये झाली. पैकी एक मुलगा बालपणीच अपघातात मृत्युमुखी पडला. 

🔸महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या अनेक आंदोलनांत त्यांनी सर्वस्व झोकून भाग घेतला. सविनय कायदेभंगाची चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात त्यांना प्रदीर्घ तुरुंगवास झाला. 1946 मध्ये त्यांची तत्कालीन मद्रास प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली. भारतीय संविधान समितीचेही ते सदस्य होते. स्वातंत्र्योत्तर काळात मद्रासच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषवले. 

🔮 *आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री*

त्यानंतर ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांची निवड झाली. याबरोबरच त्यांची लोकप्रियता वाढली. ऑक्टोबर 1956च्या राज्य पुनर्रचनेनंतर नव्याने तयार झालेल्या आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते बनले. यानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसची 3 अधिवेशने झाली. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना पोलाद व खाणकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. १९६७ पर्यंत राज्यसभेचे ते सदस्य राहिले. जानेवारी १९६६ ते मार्च १९६७ दरम्यान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९६७ मध्ये पुन्हा ते लोकसभेवर निवडून आले. त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली. निःपक्ष सभापती म्हणून ते लोकप्रिय झाले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडून जुनी व नवी काँग्रेस असे दोन गट झाले होते. इंदिरा गांधींचा पाठिंबा असलेले व्ही. व्ही. गिरी यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रयत्न केला. परंतु पदरी पराजय पडला. नंतर मात्र राजकारणातून निवृत्ती घेऊन त्यांनी आपले लक्ष अनंतपूर येथील शेती व्यवसायात वळवले.

 *राजकारणात पुन्हा सक्रिय* 

जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावामुळे आणीबाणीत ते पुन्हा सक्रिय राजकारणाकडे वळले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले (१९७७). पुन्हा त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली; परंतु काही दिवसांतच राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपतिपदी ते बिनविरोध निवडून गेले. या पदावर बिनविरोध निवड होणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपतिपदाचा मर्यादा त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून पाळली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असतानाही त्यांनी पक्षपाती भूमिका घेतली नाही. त्यांच्या या राजकीय बाण्यामुळे ते इतिहासात प्रसिद्ध झाले. कारण त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहता मोठ्या पेचप्रसंगांतून त्यांनी राष्ट्रपतिपदाची शान राखली. निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी अनंतपूर येथे घालवले.

🔹भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश करून त्यांनी काँग्रेस पक्षाचा सचिव ते भारताचे राष्ट्रपती अशी अनेक उच्चपदे भूषवली. पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री वा अन्य मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आंध्रप्रदेश राज्याच्या प्रगतीची पायाभरणी त्यांनी केली.

🔸कार्यतत्पर नेता, संयमी राजकारणी आणि सेवाभावी कार्यकर्ता या गुणविशेषांमुळे भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.


श्री. रेड्डी हे भारताचे एकमताने बिनविरोध निवडले गेलेले राष्ट्रपती होते, हे त्यांचे वैशिष्ट्य सांगता येईल. भारतीय राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले ते एक ज्येष्ठ नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक खंदे सेनानी होते. पारतंत्र्यात स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यात सुराज्यासाठी हा सेनानी सतत लढत राहिला. अत्यंत व्यासंगी व विद्वान व्यक्तिमत्त्व असलेले श्री रेड्डी ऊबदार मनाचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जात.

🙏🙏🙏

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर


*'दर्पणकार' बाळशास्त्री जांभेकर*




मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी देवगड तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) पोंभुर्ले या गावी झाला.

विश्वविख्यात माध्यमतज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटले आहे की, वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारधारानुसार जवळपास 183 वर्षापूर्वी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो. 



बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतल्या आद्य पत्रकारांपैकी एक पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. प्राचीन वाङ्मयाचे बाळकडू व संस्कार घरातून मिळाल्यामुळे त्यांचे संस्कृत व मराठी विषयांचे अध्ययन वयाच्या तेराव्या वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे ते मराठी लेखन, वाचन, व्यावहारिक गणित, तोंडी हिशोब, रामदास-तुकाराम इत्यादी चरित्र, वामन, मोरोपंत आदी प्रसिद्ध कवींच्या कविता व अमरकोश पंचकाव्यामध्ये आठव्या वर्षी पारंगत झाले. त्यानंतर ते आंग्ल भाषेच्या अभ्यासासाठी मुंबईला आले. 


एल्फिन्स्टन यांनी २१ ऑगस्ट १८२२ रोजी मुंबई येथे दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, बुक अँड स्कूल सोसायटी नावाची शिक्षण संस्था काढली. त्या संस्थेच्या शाळेत बाळशास्त्रींनी प्रवेश घेतला. इंग्रज प्राध्यापकाने हात टेकावे असे नैपुण्य त्यांनी त्या परकीय भाषेत मिळवले. ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये अग्रगण्य होते व शिक्षकांचे आवडतेही झाले. शिक्षणाशिवाय, विशेषत: पाश्चात्य देशांतील आधुनिक ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही ही बाळशास्त्रींची भूमिका होती. 


गव्हर्नर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन १८२७ मध्ये सेवानिवृत्त होऊन विलायतेला परत गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ मुंबई शिक्षण मंडळी यांनी त्यांच्या नावाने एल्फिन्स्टन स्कूल सुरू केले. जांभेकर यांची प्रखर विद्वत्ता पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. सतरा इंग्रज प्राध्यापकांच्या ताफ्यात ते एकमेव भारतीय प्राध्यापक होते. 


राष्ट्रीय नेते दादाभाई नौरोजी व गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे त्यांचे विद्यार्थी होते. त्या काळात मुंबई बाहेर सरकारी इंग्रजी व मराठी शाळा फार थोड्या होत्या. सन १८४४ पर्यंत पुणे, ठाणे, सुरत या तीन ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू झाल्या होत्या. उपरोक्त प्रत्येक विभागासाठी मुख्य शाळा तपासनीस (ज्यांना सुपरिंडेंटेंट संबोधित असत) असे नेमण्यात आले. त्या पदावर बाळशास्त्री जांभेकर यांनीही दक्षिण विभागातील मराठी व कानडी शाळा तपासणीचे काम, वाहतुकीची साधने उपलब्ध नसताना देखील चार वर्षे केले म्हणून ते पहिले मराठी शिक्षण अधिकारी होते. 


‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ने चांगले प्रशिक्षित अध्यापक तयार करावेत अशी बाळशास्त्रींची कल्पना होती. युरोपीयन अधिकाऱ्यांनी ती कल्पना स्वीकारली आणि आचार्य बाळशास्त्रींच्या शिफारसीने १८४५ मध्ये ‘अध्यापक वर्ग’ (डी.एड., बी.एड. कॉलेज) सुरू केले गेले. त्यांचे पहिले संचालक म्हणून आचार्यांनीच काम पाहिले. 


मुंबई सारख्या दाट वस्तीत मोहनगरीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, त्यांचे शीलसंवर्धन व्हावे या उद्देशाने आचार्यांनी मुंबईत त्यांच्या घराशेजारी वाडा भाड्याने घेऊन पहिले विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. तेथे ते विद्यार्थ्यांच्या शिस्त, आरोग्य, संस्कार व शिक्षण यांकडे जातीने लक्ष देत. केवळ शिक्षणाचा प्रसार करून चालणार नाही, तर सनातनी आणि प्रतिगामी लोकांच्या मनावर बेगडी श्रद्धांचा जो कालबाह्य पगडा आहे तो हटवला पाहिजे. लोकांच्या भावना संवेदना विशाल-उदार झाल्या पाहिजेत यासाठी जांभेकर हिरीरीने काम करत. त्या विषयावर त्यांचा ‘Liberty of Sentiments’ हा लेख प्रसिद्ध आहे. त्यासाठी देशी भाषेत वृत्तपत्र असणे अत्यावश्यक आहे हे जाणून त्यांनी मराठीत पहिले वृत्तपत्र "दर्पण" सुरू केले. 


बाळशास्त्री यांनी ‘दर्पण’ प्रकाशित करण्यामागील आपली भूमिका १२ नोव्हेंबर १८३१ रोजी प्रॉस्पेक्ट (प्रस्ताव) या नावाने प्रकाशित केली. ‘दर्पण’चा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रसिद्ध झाला. ते द्विभा‍षिक वर्तमानपत्र होते. एकच वेळी इंग्रजी व मराठीत निघणाऱ्या त्या पत्राच्या पानातील दोन स्तंभात डावीकडचा स्तंभ इंग्रजी व उजवीकडच्या स्तंभात भाषांतर असे. त्या्स एकूण आठ पाने असत. 


जांभेकर यांनी वाचकांची मागणी वाढू लागल्यानी 'दर्पण साप्ताहिक' ४ मे १८३२ पासून सुरू केले. जांभेकर यांची संपादकीय विचारप्रवर्तक असत. ते सभ्य प्रतिष्ठित भाषेत सरकारवर सडेतोड टीका करत. ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा ब्रिटिशांचे शासन होते आणि वृत्तपत्र नियंत्रण कडक होते. ते १८३५ नंतर थोडे शिथील झाले. त्यावेळी साक्षर वर्ग कमी होता. त्यामुळे वाचकांची संख्याही कमी होती. तरीही ‘दर्पण’चे त्या काळात तीनशे वर्गणीदार होते. त्या काळात ब्रिटिशांच्या नोकरीत असूनसुद्धा बाळशास्त्री यांनी सरकारला रूचो वा न रूचो, नि:स्पृहपणे विविध सामाजिक विषयांवर ‘दर्पण’ मधून लेख, अग्रलेख लिहिले. ते दूरदृष्टीचे आहेत. 

जस्टीस ऑफ पीस


केवळ वृत्तपत्रांद्वारे शैक्षणिक कार्य त्यांनी केले. वृत्तपत्रांसारखे माध्यम आणि त्याची बिकट वाट हे गणित बाळशास्त्रींनी चांगलेच जमविले. केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन 'दर्पण' प्रकाशित केले. याची साक्ष म्हणजे 'दर्पण' मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र त्याकाळी सुरु ठेवले. यावरुनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू स्पष्ट होतो. तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला.

सनातन धर्मातील एकांतिक संन्यास प्रवृत्ती, अंधगुरूभक्ती, कर्मठ कर्मकांडे. चातुर्वर्ण्य, जन्मनिष्ठ उच्चनीचता, जातिभेद, धर्माचा अतिरेक इत्यादींबाबत विचारमंथन ‘दर्पण’ मधून झाले. स्त्रियांवर लादलेली बंधने, बालविवाह, विधवा विवाह, पारतंत्र्य, केशवपन यांसारख्या गोष्टींमुळे समाजरचना चुकीच्या पायावर उभी आहे. त्यातील दोष काढले नाहीत तर पिढ्यान् पिढ्या ते सर्वांना भोगावे लागेल. त्यातून समाजाचा, धर्माचा, राष्ट्राचा विकास तर होणार नाही, पण शृंखलेमुळे अवनती होईल आणि त्याला पारतंत्र्याचे, गुलामीचे कायम स्वरूप येईल हे जांभेकरांनी ‘दर्पण’ मधून सांगितले. ‘दर्पण’चा शेवटचा अंक २६ जून १८४० रोजी प्रसिद्ध झाला व ते बंद करण्यात आले. त्या अंकात 'लास्ट फेअरवेल' हे संपादकीय लिहून त्यांनी वाचकाचा निरोप घेतला. 


इंग्रजी राज्याबरोबर विद्या आली आणि धर्म व संस्कृतीसुद्धा आली. या बदलावर बाळशास्त्री व नाना शंकरशेठ यांनी जहरी टीका केली. पाश्चात्य विद्वत्ता व विज्ञान यांबद्दल त्यांना रास्त आदर होता पण मिशनरींच्या धर्मांतर धोरणावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. तत्कालीन असा एकही विषय नाही की ज्यास बाळशास्त्री जांभेकर यांनी स्पर्श केला नाही. बाळशास्त्री जांभेकर यांचा ज्योतिष व गणित या विषयांतील अधिकार फार मोठा होता. त्यांनी ‘शून्यलब्धि’ म्हणजेच Differential calculus या विषयावर मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिले. बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक तर होतेच, सोबत ते मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’चे संस्थापक संपादक देखील होते. त्याचबरोबर पहिले मराठी असिस्टंट प्रोफेसर, ‘बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी’ या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक, नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी या ‘लोकसुधारणा’ व्यासपिठाचे संथापक, पहिले मराठी शाळा तपासनीस, पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक, कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक, ज्ञानेश्वरीची पहिली शिळाप्रतही (छापील प्रत) त्यांनीच १८४६ मध्येह प्रसिद्ध केली. 


याशिवाय पहिले दूरदृष्टीचे समाजसुधारक, महाराष्ट्राचे आद्यशिक्षण तज्ज्ञ, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांचा उल्लेख अभिमानाने केला जातो. त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्राविण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता. 


बाळशास्त्री जांभेकर यांचे १७ मे १८४६ रोजी निधन झाले. 


कर्मवीर दादासाहेब गायकवाड


 

*कर्मवीर दादासाहेब गायकवाड*

✨✨✨✨✨✨✨✨✨     .   भाऊराव कृष्णराव गायकवाड  हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ सहकारी, दलित समाजाचे नेते व सुधारक होत.दादासाहेब या नावानेच ते  सर्वत्रओळखले जात.


त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९०२ रोजी झाला तर त्यांचा स्मृतीदिन आहे २९ डिसेंबर १९७१


बाबासाहेब आंबेडकरांचे  यांचे विश्वासू सहकारी व  आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या प्रमुख नेत्यात ते होते. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.


बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता.      दलितांच्या उद्धारार्थ त्यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. महाडच्या सत्याग्रहात (१९२७) व नासिकच्या काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रहात (१९३०) ते आघाडीवर होते. त्यावेळी त्यांना निर्दय मारपीट सहन करावी लागली व तुरुंगातही जावे लागले. १९५३ मध्ये त्यांना भूमिविषयक सत्याग्रहात तुरुंगवास भोगावा लागला. १९५८ मध्ये त्यांनी भूमिहीनांना भूमी मिळावी, म्हणून मोठे आंदोलन सुरू केले.         २ मार्च १९३०च्या वेळी डॉ.आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांचा सहभाग मोलाचा होता.


१४ ऑक्टोबर १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व आंबेडकरांसमवेतच त्यांनी दलितोद्धाराच्या कार्यास सुरुवात केली होती.


१९३७ ते १९४६ या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. १९५७-५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते. १९६२ ते ६८ दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते.


दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतील काही :


* 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा मराठी व इंग्रजी ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.

* ’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’ - लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले

* दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.

* अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ.

* भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ.

* कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्त्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अ‍ॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.

* दि.रं. भालेराव यांनीही ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ या नावाचे एक छोटे चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.


*पुरस्कार व सन्मान* :


* कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे २००२ पासून दिला जाणारा पुरस्कार आहे.

* दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना' या नावाची एक योजना २००४ पासून आहे. २०१२ साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या.

* भारत सरकारने गायकवाडांना १९६८ मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला.

* नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड सभागृह’ नाव दिले आहे.

* मुंबईत अंधेरी भागात 'दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र' नावाची संस्था आहे.

* दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची ‘डॉक्युमेंटरी फिल्म’ आहे.


*आंबेडकरांसोबत प्रथमपासून त्यांनी आघाडीवर राहून काम केले. त्यांच्या गुणांची आणि नेतृत्वाची अनेक वेळा कसोटी लागली. डॉ. आंबेडकरांचे एक ज्येष्ठ, विश्वासू व कर्तबगार सहकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. साधी राहणी, मनमिळाऊ स्वभाव, विशुद्ध चारित्र्य, प्रखर ध्येयनिष्ठा, प्रभावी वक्तृत्व, अन्यायाविरुद्ध झगडण्याची जिद्द इ. गुणांमुळे त्यांचे नेतृत्व आदरणीय ठरले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन (१९६८) त्यांच्या कर्तृत्वाचा व समाजसेवेचा गौरव केला. त्यांच्या कार्यरत जीवनामुळेच लोक त्यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी लावत होते. दिल्ली येथे त्यांचे निधन झाले*.   

९५६११५४१४०

डॉ. पंजाबराव देशमुख

   डॉ. पंजाबराव (भाऊसाहेब) देशमुख ..

 डॉ.पंजाबराव देशमुख या महान व्यक्तिमत्वाने हिमालयाच्या उंचीचे कार्य करून ठेवले आहे. आज ते पाहाता त्यांची दुरदृष्टी वर्तमानाचा वेध घेणारी आणि भविष्यातील पाऊले ओळखणारी होती याची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. एका ध्येयाने प्रेरीत झालेले ते व्यक्तिमत्व होते. भाऊसाहेबांचे उद्दीष्ट, ज्ञान आणि दुरदृष्टी अचंबित करणारी होती. भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख हे खऱ्या अर्थाने समाजसुधारक म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात नावाजलेले एक मोठं नाव आणि शिक्षण क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्थानांच्या माध्यमातून आज दिसत आहे.


डॉ. पंजाबराव शामराव देशमुख हे भाऊसाहेब देशमुख म्हणून ओळखले जाणारे एक सामाजिक कार्यकर्ते आणि भारतातील शेतकर्‍यांचे नेते होते. 1952 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कृषीमंत्री होते. चला तर मग पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र पाहूया.

▪ त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पापाळ येथील मराठा कुटुंबात 27 डिसेंबर 1898 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव आणि आईचे नाव राधाबाई. त्यांचे मूळ आडनाव कदम होते. प्राथमिक शिक्षण आपल्या गावी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना सोनगाव आणि नंतर कारंजा लाड येथे पाठविण्यात आले. कारंजा लाड येथे, त्यांनी अमरावती येथील हिंद हायस्कूल आणि पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी नववी इयत्तेत प्रवेश केला.

त्यावेळी उच्च शिक्षण भारतात उपलब्ध नव्हते. बरेच विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्याला केंब्रिज विद्यापीठातून बॅरिस्टर व्हायचे होते. घरी तीव्र दारिद्र्य असूनही, त्यांनी प्रवास करण्यासाठी पुरेसे पैसे मिळविले. 

▪ त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले आणि 1921 मध्ये पीएचडी, बॅरिस्टर पदवी आणि संस्कृतमध्ये एम.ए. त्यांनी पीएच.डी. मूळ आणि वैदिक साहित्यातील धर्माचा विकास या विषयासह महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजात त्यांनी शिक्षण घेतले. 

▪ *अमरावतीच्या अंबाबाई मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला, ज्याचा उच्चवर्णीयांनी निषेध केला*. भीमराव रामजी तथा  *डॉ.आंबेडकर यांनी या आंदोलनात त्यांचे समर्थन केले. मंदिर व्यवस्थापनाने नंतर अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिला*.

▪ डॉ. पंजाबराव देशमुख यांनी त्यांच्या घरापासून दुसरी समानता चळवळ सुरू केली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने  पारंपारिक क्रिया “श्राद्ध” करण्यास सांगितले,त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत वसतिगृहातून घरी आणले आणि त्याच्या आईसमोर त्यांजकडून कार्य केले.

*शैक्षणिक कार्य* :

1931 मध्ये त्यांनी अमरावती येथे शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ही शिक्षण संस्था महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाची झाली. ही संस्था 24 पदवी महाविद्यालये, 54 इंटरमीडिएट महाविद्यालये, 75 हायस्कूल आणि 35 वसतिगृहे चालविते. अकोला येथे म्हणजेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्यांचे नाव असलेले कृषी विद्यापीठ कार्यरत आहे. त्यांनी महाराष्ट्रभर शिक्षणाची पाया मजबूत केला.

*कार्याचा थोडक्यात आढावा* :

▪ 1927 – शेतकरी संघाला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ वृत्तपत्र सुरू केले.

वैदिक साहित्यात धर्मातील मूळ व विकास यावर डॉक्टरेट.

▪ 1933 – कर्जमाफी अधिनियम मंजूर करण्यात मोठा वाटा आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त केले जाते. म्हणूनच त्यांना भारतातील शेतकरी क्रांतीचे जनक म्हटले जाते.

▪ 1926 – मुशफिंदच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह स्थापन करण्यात आले.

▪ 1927 – शेतकरी संघाची स्थापना.

▪ 1932 – श्री. अ. डब्ल्यू.पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शैक्षणिक संस्थेची स्थापना.

▪ 1950 – लोक विद्यापीठ (पुणे) ची स्थापना, नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात बदलली.

▪ 1955 – भारत कृषक समाजची स्थापना आणि राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी व विक्री महासंघ स्थापना.

▪ 1956 – अखिल भारतीय दलित महासंघाची स्थापना.

▪ 18 ऑगस्ट 1928 – अस्पृश्यांसाठी अमरावती अंबाबाई मंदिर सुरू करण्यासाठी सत्याग्रह.

▪ 1930 – प्रांतीय विधान परिषदेत निवडले गेले. शिक्षण, कृषी, सहकार मंत्री

▪ 1952, 1957 आणि 1962 मध्ये तीन वेळा लोकसभेवर निवडले गेले.

▪ 1952 ते 1962 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.

▪ 1932 मध्ये देवस्थानची मालमत्ता शासनाच्या ताब्यात घ्यावी आणि विधायक काम व्हावे या उद्देशाने हिंदू देवस्थान प्रॉपर्टी विधेयक 1932 मध्ये आणले गेले.

▪ प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघटना स्थापन

▪ 1960 – दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले. 



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


जन्म - ३० एप्रिल १९०९ (अमरावती)

स्मृती - १० नोव्हेंबर १९६८


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ यावली अमरावती येथे झाला. 


माणिक बंडोजी ठाकूर हे त्यांचे नाव. अंगभूत गुणांमुळे आणि विवेकनिष्ठ जीवनदृष्टीमुळे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या नावाने ओळखले जाणारे गेल्या शतकातले ते महान प्रबोधनकार होते.


त्यांच्या ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला (जि.अमरावती) आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे किर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. 


एके दिवशी गुरूमहाराजांनी माणिकला ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली व म्हटले, की ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा. ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. 


ईश्वरभक्ती, सद्‌गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले. ते गांधी आणि विनोबांचे शिष्य होते. त्यांनी खंजिरी घेऊन भजन करत देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केलं. 

त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. 


तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. स्त्रीचं स्थान हे कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्थे मध्ये महत्त्वाचं आहे, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. 


स्त्रीला अज्ञानात आणि बंधनात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिलं. ईश्वरभक्ती करतानाच दुबळ्यांचीही सेवा करा, असं ते नेहमी सांगत. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रामविकासावरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे

   

गुरू : आडकोजी महाराज

भाषा : मराठी, हिंदी

साहित्यरचना : ग्रामगीता, 

                     अनुभव सागर 

                      भजनावली,   

                      सेवास्वधर्म, 

                      राष्ट्रीय भजनावली

कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 

           जातिभेद निर्मूलन

वडील : बंडोजी

आई : मंजुळाबाई

             तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

 भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.मरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.

 ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते. तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

📒 *साहित्य संमेलने*

             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.

📚 *पुस्तके*

            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)

आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)

ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)

डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)

राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)

राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)

राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)

लहरकी बरखा (हिंदी)

सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

📙 *ग्रामगीता*

       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।

साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी। संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला

भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

*हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-*

           हर देश में तू ...

हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।

तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥

सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।

फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥

चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।

कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥

यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।

तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे १० नोव्हेंबर १९६८ रोजी निधन झालं.

संत तुकडोजी महाराज यांची कविता :


या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोर्‍या, त्यातूनी होती चोर्‍या

दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला

भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या